अजितदादांच्या खुर्चीवर आता ‘वहिनी’ बसणार? झिरवाळांच्या एका मागणीनं महायुतीत खळबळ; राष्ट्रवादीत नवा वारसदार कोण?
मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन २४ तास उलटत नाहीत, तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘वारसा’ युद्धाची ठिणगी पडली आहे. अजितदादांसारखा कणखर नेता गमावल्याने पोरक्या झालेल्या राष्ट्रवादीला आता सावरणार कोण? या प्रश्नाचे उत्तर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी थेट ‘सुनेत्रा पवार’ यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवून दिले आहे. झिरवाळ यांच्या या मागणीने पक्षांतर्गत समीकरणांना वेगवान वळण दिले असून, “वहिनींना उपमुख्यमंत्री करा,” हा सूर आता जोर धरू लागला आहे.
झिरवाळांची ‘पॉवरफुल’ खेळी; दादांचा वारसा सुनेत्रा पवारांकडे?
अजितदादांच्या अंत्यविधीनंतर भावूक झालेल्या नरहरी झिरवाळ यांनी थेट सुनेत्रा वहिनींचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले. ते म्हणाले, “दादांनी हा पक्ष रक्ताचं पाणी करून उभा केला. आज तो टिकवायचा असेल, तर पवार कुटुंबातील व्यक्तीच पुढे हवी. सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान देऊन उपमुख्यमंत्री करणे, हीच कार्यकर्त्यांची भावना आहे. वरिष्ठ नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा.” झिरवाळ यांच्या या विधानामुळे पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा की कौटुंबिक भावनिकता?
राष्ट्रवादीमध्ये नेतृत्व करू शकणारे अनेक चेहरे आहेत, मात्र सद्यस्थितीत निर्माण झालेली पेचप्रसंग पाहता दोन प्रवाह दिसत आहेत:
भावनिक लाट: सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांना राज्याच्या राजकारणात आणून उपमुख्यमंत्री केल्यास, विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये मोठी भावनिक लाट निर्माण होऊन पक्ष सावरला जाऊ शकतो.
अनुभवी नेत्यांची कोंडी: छगन भुजबळ, सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांसारखे नेते या प्रस्तावावर काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे. अजितदादांच्या निधनानंतर एखादा ‘कौटुंबिक’ चेहराच पक्षाला एकसंध ठेवू शकतो, की अनुभवी नेत्याकडे सूत्रे द्यावीत, यावर पक्षात दोन गट पडण्याची चिन्हे आहेत.
महायुती आणि शरद पवार गट: कोणाची खेळी यशस्वी ठरेल?
अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटही सावध पावले टाकत आहेत. दुसरीकडे, शरद पवार साहेबांच्या गटाकडूनही काही हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देऊन महायुती आपली ‘वोट बँक’ टिकवणार की राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू होणार? या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या काही दिवसांतच मिळेल.
पार्थ आणि जय पवारांचे भवितव्य काय?
सुनेत्रा वहिनींचे नाव पुढे आल्याने पार्थ पवार आणि जय पवार यांच्या सक्रिय राजकारणातील भूमिकेवरही चर्चा सुरू झाली आहे. तरुणांना संधी देण्याऐवजी वहिनींकडेच धुरा देऊन पक्ष सावरण्याचा प्रयत्न अधिक सुरक्षित मानला जात आहे.
—
Deepak Kaitke




