पावसाळा आल्यानंतर जसे बेडूक बाहेर येतात, तसे ठाकरे बंधू निवडणूक असल्यामुळे बाहेर पडले आहेत. निवडणूक आली की नाटकं करतात. लोक येतात, शिट्ट्या मारतात, पण मतांमध्ये त्याचे परिवर्तन होत नाही. पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे होती, तेव्हा तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्लेत. लोक आता यांना स्वीकाराला तयार नाही. लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आता मतदार महायुतीवर विश्वास ठेवतात.
मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी एक तरी महानगरपालिका जिंकून दाखवावी, अशा शब्दांत रविवारी नाशिक येथील प्रचारसभेत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंवर टीकेची तोफ डागली. “नाशिकसह सर्व महापालिकांची निवडणूक आता २ दिवसांवर आली आहे. नाशकात आपल्याला १२२ पैकी १००हून जास्त नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. या वेळेसही कुंभमेळा आहे. आपल्याला भरपूर काम करायचे आहे. प्रयागराजपेक्षा मोठा कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. अर्धी कामे सुरू आहेत, अर्धी कामे आचारसंहिता संपली का सुरू होतील. आपण सर्व रस्ते सिमेंटचे करणार आहोत. म्हणजे पुढली २० वर्ष एकही खड्डा पडणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




