टॉप स्टोरी महाराष्ट्र

भारतीय जनता पक्षाची विजयी पताका

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष हाच नंबर १ ठरला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरसह प्रमुख महापालिकांवर महायुतीने सत्ता काबीज केली आणि राज्यात आपली विजयी पताका दाखवून दिली.

तेवीस महापालिकांमधे सर्वाधिक नगरसेवक म्हणून भाजपाने स्थान मिळवले. मुंबई महापालिकेवर भाजपा- शिवसेना (शिंदे) महायुतीने विजय मिळवला आणि सलग पंचवीस वर्षे सत्तेवर असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला हटविण्याचा संकल्प पूर्ण केला. वीस वर्षांनंर एकत्र आलेल्या ठाकरे बंधुंना मुंबईकरांनी नाकारले.
उध्दव ठाकरे यांच्या सेनेने भाजपा व शिंदे शिवसेनेशी अटीतटीची झुंज दिली पण राज ठाकरेंच्या मनसेचा कुठेच प्रभाव पडला नाही. ठाण्यावर फक्त आपलेच वर्चस्व हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिध्द करून दाखवले. नवी मुंबईत फक्त आपलेच चालणार हे वनमंत्री गणेश नाईक यांनी दाखवून दिले.

पुणे व पिंपरी चिंचवडमधे भाजपाकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. हिंतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने वसई- विरारचा गड कायम राखला. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी लातूरमधे काँग्रेसची सत्ता आणून भाजपाला धडा शिकवला.

७० हजार कोटी रूपयांचे बजेट असलेल्या मुंबई मनपाकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. जवळपास ३० वर्षे येथे शिवसेनेचे राज्य होते. यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येत त्यांनी आव्हान उभे केले होते. तथापि, भाजपा-शिंदेसेनेच्या झंझावातात ठाकरे बंधूंचा टिकाव लागला नाही. बीएमसीमध्ये भाजपा-शिंदेसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले असून, येथे भाजपाचा महापौर होणे निश्चित मानले जात आहे.

दरम्यान, राज्यातील २९ पैकी २३ मनपामध्ये भाजपाने मुसंडी मारली असून, कुठे स्वबळावर तर कुठे शिंदेसेनेसह सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येते.
विदर्भातील नागपूर मनपात भाजपाने १०२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता हस्तगत केली आहे.

८० सदस्यीय अकोला मनपात भाजपाला ३८ जागा जिंकता आल्या. येथे स्वबळावर सत्ता स्थापन करणे त्यांना शक्य नाही. अमरावतीमध्ये एकूण ८७ पैकी २५ जागा जिंकून भाजपा क्रमांक १ चा पक्ष ठरला असला तरी सत्तेसाठी त्यांना युवा स्वाभीमान व शिंदेसेनेचा आधार घ्यावा लागणार आहे.
भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गड मानल्या जाणाºया चंद्रपूर महानगर पालिकेत मात्र काँग्रेसने विजयी पताका फडकावली आहे. ६६ सदस्यीय चंद्रपूर मनपात भाजपाला २३ जागाच जिंकता आल्या.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *