उल्हासनगर

उल्हासनगरात १० किलो सोन्याच्या मोबदल्यात मिळालेल्या मालमत्तेवरून रणकंदन; माजी पोलिसासह १२ जणांवर गुन्हा दाखल

​उल्हासनगर , दि . १२ प्रतिनिधी : १० किलो सोन्याच्या मोबदल्यात मिळालेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेवरून उल्हासनगरात मोठा वाद उफाळून आला आहे. महापालिकेने मालमत्तेवर तोडक कारवाई केल्यानंतर, संबंधित जागेवर घुसखोरी करून मारहाण आणि धमकावल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी एका निवृत्त पोलिसासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार दिनेश मोतिरामानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दुबईत असताना स्वकष्टाने १० किलो सोने खरेदी केले होते. १९९९ मध्ये त्यांनी हे सोने त्यांच्या पत्नीचे काका गुरमुख मनकानी यांना दिले होते. त्याच्या मोबदल्यात त्यांना उल्हासनगरमधील ब्लॉक क्रमांक ५३० मधील सुमारे ४६५० स्क्वेअर फूट जागा (खोली क्र. १०५९ आणि १०६०) देण्यात आली होती. २०१४ मध्ये या व्यवहाराची लेखी नोंदही करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असून मोतिरामानी कुटुंबाने २०२५ मध्ये यावर दावा दाखल केला आहे.

एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर, महापालिकेने अतिक्रमण विभागामार्फत ५ मार्च २०२६ रोजी या जागेवरील दोन दुकानांचे बांधकाम तोडले. हे प्रकरण न्यायालयात असतानाही प्रशासनाने कारवाई केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. मात्र, खऱ्या वादाला १० मार्च रोजी सकाळी सुरुवात झाली. अशोक मानकानी यांनी पाठवलेले १० ते १५ लोक ज्यात अशोक पवार, कांचन टापालिया, कांचन सुर्वे, निखिल कदम, अशोक राठोड व इतरांचा समावेश असुन ते टेंपोसह सदर ठिकाणी पोहोचले होते.

दरम्यान या टोळक्याने तोडलेल्या दुकानातील सामान बाहेर फेकण्यास सुरुवात केली. मोतिरामानी यांच्या मुलीने विरोध केला असता, आरोपींनी तिच्याशी धक्काबुक्की व अश्लील वर्तन केले. मध्यस्थीसाठी आलेल्या दिनेश मोतिरामानी यांनाही मारहाण करण्यात आली. या गोंधळात घराचे वायफाय, सीसीटीव्ही आणि वीज कनेक्शन तोडण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तपासणी केली असता, घटनास्थळावरून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे जुन्या एसीचे कॉम्प्रेसर आणि कॉपर पाईप गायब असल्याचे समोर आले आहे.तर या प्रकरणात अशोक पवार नावाच्या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे समोर आले असून, पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत. विठ्ठलवाडी पोलिसांनी याप्रकरणी अनधिकृत प्रवेश, मारहाण आणि चोरीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.विशेष म्हणजे हे न्यायप्रविष्ट प्रकरण असताना सुध्दा गेल्या पंचवीस वर्षापूर्वी बांधलेले दोन दुकाने अनधिकृत बांधकाम आहे म्हणुन महापालिकेने तोडू कारवाई केली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *