टॉप स्टोरी महाराष्ट्र

दलाल आणि अफवांचे दिवस संपणार? शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारभावाचे ‘लाईव्ह अपडेट्स’ देण्यासाठी सरकारची मोठी खेळी!

विशेष प्रतिनिधी:शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य दर मिळावा आणि बाजारपेठेतील माहितीअभावी होणारी त्यांची फसवणूक थांबावी, यासाठी राज्य सरकारने आता थेट तंत्रज्ञानाचा हत्यार म्हणून वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत असो वा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, प्रत्येक क्षणाला शेतमालाचे भाव काय आहेत, याची अचूक आणि अद्ययावत माहिती शेतकऱ्यांच्या हातातील मोबाईलपर्यंत जलद गतीने पोहोचवण्यासाठी एक ‘हायटेक’ यंत्रणा उभारली जाणार आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कृषी पणन मंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली.

बाजारपेठेतील ‘माहितीच्या युद्धा’त शेतकरी ठरणार सरस

अनेकदा बाजारात मालाची आवक जास्त असल्याचे भासवून किंवा खोट्या अफवा पसरवून शेतमालाचे दर पाडले जातात. माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्याला मिळेल त्या भावात माल विकावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी जागतिक पणन व्यवस्थेचा अभ्यास करून आधुनिक प्रणाली विकसित केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल कोणत्या बाजारपेठेत विकल्यास अधिक नफा मिळेल, याचे अचूक आकलन होणार आहे. “शेतकऱ्याला प्रत्येक क्षणाच्या बाजारभावाची माहिती मिळाल्यास तो मध्यस्थांवर अवलंबून न राहता स्वतः निर्णय घेऊ शकेल,” असे मंत्री रावल यांनी ठणकावून सांगितले.

आशियाई विकास बँकेच्या मदतीने बाजार समित्यांचे ‘स्मार्ट’ रूप

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये केवळ व्यापार न होता तिथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असाव्यात, यासाठी आशियाई विकास बँकेचे (ADB) सहकार्य घेतले जाणार आहे. या बँकेच्या माध्यमातून राज्यासाठी एक सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान प्रकल्प तयार करण्यात येईल. तसेच, महाराष्ट्रातील विशिष्ट फळे आणि पिकांचे भौगोलिक मानांकनानुसार (GI Tag) ब्रँडिंग करून त्यांचा जागतिक स्तरावर प्रचार केला जाणार आहे.

महोत्सव आणि गोदामांतून शेतमालाला उभारी

शेतकऱ्यांनी केवळ माल पिकवू नये तर त्याचे मार्केटिंगही शिकावे, यासाठी आंबा, संत्रा आणि मिलेट महोत्सवांचे आयोजन विभागवार केले जाईल. विशेषतः काजू उत्पादकांसाठी ठाणे जिल्हा आणि इतर काजू क्षेत्रांत १० हजार मेट्रिक टन क्षमतेची भव्य गोदामे उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे साठवणूक क्षमता वाढून शेतकऱ्यांना योग्य दरासाठी प्रतीक्षा करणे सोपे होणार आहे. बैठकीत संत्रा केंद्र उभारणी आणि ‘शेतकरी भवन’ योजनेच्या कामाला गती देण्याचे आदेशही देण्यात आले.

या बैठकीस आमदार चरणसिंग ठाकूर, संजय कदम आणि पणन मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तंत्रज्ञानाच्या या क्रांतीमुळे बळीराजा आता जागतिक बाजाराशी थेट जोडला जाणार आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *