माणूसपणाची पाऊलवाट

ग्रामीण आरोग्य चळवळीच्या प्रणेत्या

ग्रामीण भागात तालुका म्हणून ओळख मिरवणारी अनेक शहरे कधी जिल्ह्याइतकी मोठी झाली, हे कळलेच नाही. शहरांमध्ये माणसं वाढली; मात्र जमिनी आणि ‘तालुका’ नावाचा शिक्का तसाच कायम राहिला. परिणामी प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे कुठल्याही शासनाला सहज शक्य झाले नाही. महाराष्ट्रात आज अशी चाळीसहून अधिक शहरे आहेत, ज्यांनी तालुक्याच्या चौकटीतून बाहेर पडत जिल्ह्यासारखे स्वरूप धारण केले आहे. त्यातच आंध्र सीमेलगत वसलेले धर्माबाद हे शहर येते.

धर्माबादमध्ये सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी डॉ. मीना जोशी (पूर्वाश्रमीच्या मीना देशपांडे) यांनी आरोग्यसेवेच्या दृष्टीने ‘दवाखाना’ या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप दिले. कालांतराने तो दवाखाना केवळ उपचार केंद्र न राहता या शहराच्या स्त्री-आरोग्याचे वैभव म्हणून ओळखला जाऊ लागला.

दवाखाने अनेक असतात, डॉक्टरही अनेक असतात; पण जेव्हा त्या दवाखान्याला ‘सेवालय’ होण्याचे बळ मिळते आणि डॉक्टरला सामाजिक सेवेचा हातखंडा लाभतो, तेव्हा त्याची ओळख वेगळी ठरते. डॉ. मीना जोशी यांच्याबाबतीतही असेच घडले. त्या प्रत्येक रुग्णाशी आधी समुपदेशन करतात आणि नंतर उपचार. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना मुलींची संख्या वाढली पाहिजे, मुलगी म्हणजे लक्ष्मीचे रूप आहे, मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे, मुलींनीही मुलांप्रमाणे धाडसाने पुढे गेले पाहिजे, या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयांना त्यांनी हात घातला.

स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतीत हातखंडा आणि स्त्रियांच्या आजारांवर मूळ औषध देणारी डॉक्टर अशी मीना यांची ओळख होती; पण केव्हा त्या स्त्रियांच्या सामाजिक मतपरिवर्तनाच्या सल्लागार बनल्या, हे कुणालाच कळले नाही. मागील वीस, पंचवीस वर्षांत त्यांनी खूप मोठा पल्ला गाठला. त्यांचे कार्य केवळ धर्माबादपुरते किंवा आसपासच्या ६० गावांपुरते मर्यादित राहिले नाही; ते जिल्हा आणि राज्य पातळीवर एका सक्षम समुपदेशकाच्या रूपाने विस्तारत गेले. सात हजारावून अधिक प्रसूती तेही दोषमुक्त असे रिकॉर्ड डॉ. मीना यांच्या नावे आहे.

वैद्यकीय क्षेत्रातून समाजपरिवर्तन घडवून आणणारा कुठलाही जागतिक पातळीवरचा सर्वोच्च पुरस्कार असेल, तर तो डॉ. मीना जोशी यांना दिला पाहिजे, असे म्हणणारे त्यांचे हजारो रुग्ण, सामाजिक कार्याचे चाहते आज नव्या विचारांच्या, नव्या धाटणीच्या महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी सज्ज आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात गुंजोटी नावाचे छोटेसे गाव. या गावातील संस्कार आणि प्रतिभेसाठी ओळखले जाणारे देशपांडे कुटुंब, नर्मदा देशपांडे आणि नागोराव देशपांडे या पती,पत्नीला कदाचित कल्पनाही नव्हती की, त्यांच्या पोटी जन्मलेली ‘मीना’ ही मुलगी स्त्री-परिवर्तनासाठी एक सशक्त आविष्कार ठरेल.
गुंजोटी, सोलापूर आणि विविध विद्यापीठांमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जिथे अनेक शिकलेले डॉक्टर जाण्याचे टाळतात, अशा ग्रामीण भागात जाऊन रुग्णसेवा करायची, हा ठाम ‘मानस’ डॉ. मीना यांनी केला. त्यातूनच डॉ. मीना यांचा हा जोरकस प्रवास सुरू झाला.

आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्त्री-परिवर्तनाची लढाई लढणाऱ्या अनेक सेवेकऱ्या आहेत. त्या प्रत्येकीची दखल घेणे कदाचित शक्य नसेल; पण ज्यांनी आपल्या कार्याचा असा दीप प्रज्वलित केला की त्या प्रकाशामुळे संपूर्ण राज्याला नवी ओळख, दिशा मिळाली, त्यात डॉ. मीना यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महिलांचा विकास, महिलांची उन्नती आणि महिलांचा हक्काचा बुलंद आवाज ही अत्यंत किचकट प्रक्रिया जर चिरंतर टिकवायची असेल, तर त्यासाठी डॉ. मीना यांच्यासारखा भक्कम आधार आवश्यक आहे.
डॉ. मीना म्हणतात, “आज ग्रामीण महाराष्ट्राकडे पाहायला कुणालाही वेळ नाही. मी जेव्हा ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे डॉक्टर म्हणून पाहते, तेव्हा लक्षात येते, आपण चंद्रावर जाण्याच्या गप्पा मारतो; पण ‘ती’ बिचारी अजूनही भाकरीच्या ‘चंद्रा’चा शोध घेत हरवलेली असते. तिला स्त्री-शिक्षणाचे महत्त्व माहीत नाही. माझी मुलगी शिकली तर ते किती मोठे बळ आहे, याची जाणीव नाही. माझ्या घराचा खरा आधार मीच आहे, हेही तिला माहीत नाही.”

या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणे गरजेचे आहे. संपूर्ण कुटुंबाचा आधार असलेली ती एकमेव माऊली असते; पण तिचा दर्जा मात्र दुय्यम ठेवला जातो. स्त्रीचे केवळ शारीरिक आरोग्य चांगले असून चालत नाही; तिची मानसिकता समजून घेऊन तिला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा लागेल.
आज महाराष्ट्रात असा एकही जिल्हा नाही, जिथे सामाजिक विचारांच्या अनुषंगाने मी पाऊल ठेवले नाही. प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण सावलीत मला ती स्त्री आजही झिजताना दिसते. तुम्ही कितीही परिवर्तनाच्या गप्पा मारा, तिला कितीही ‘तू बदल’ असे सांगा, ती बदलत नाही, कारण तिला बदलू दिले जात नाही. हीच खरी शोकांतिका आहे. त्यातही मी माझा लढा कायम ठेवला आहे.

मीना सांगतात, “आमच्या गुंजोटी गावात राघवेंद्र साईवाले नावाचे आयुर्वेदिक डॉक्टर होते. ते केवळ डॉक्टर नव्हते; ते माणसांच्या अपेक्षांचे केंद्र होते. त्यांच्या दवाखान्यात पाऊल टाकले की मानसिक आणि शारीरिक ओझे हलके व्हायचे. त्या वेगळेपणाचे निरीक्षण मी तेव्हाच केले, आणि तेव्हाच ठरवले हा पायंडा आपण पुढे राज्यभर पडायचा. आज मानसिक आरोग्यावर अधिक काम करण्याची गरज आहे, म्हणूनच मी राज्यभरात हे काम सुरू केले आहे.” मी ज्यांना खोलवर शिकवण्यात यशस्वी झाले,त्या असंख्य डॉ. मीना यांचे काम नेटाने पुढे नेतात, जी माझी सर्वात मोठी कमाई ठरली. 

डॉ. मीना यांचे विचार मनाच्या कप्यात कोरून ठेवावे असेच आहेत, त्या म्हणतात,
स्त्री परिवर्तन ही केवळ एका वर्गाची किंवा एका दिवसाची लढाई नाही, तर ती समाजाच्या मानसिकतेत बदल घडवण्याची दीर्घ प्रक्रिया आहे. स्त्रीला माणूस म्हणून समान अधिकार, संधी आणि सन्मान मिळावा, यासाठी समाजाने काही टप्पे पार केले आहेत; पण अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. स्त्री परिवर्तनासाठी आतापर्यंत काय केले गेले आहे आणि पुढे अधिक जागरूक होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

आतापर्यंत काय केले गेले आहे

स्त्री शिक्षणाची दारे उघडणे हा स्त्री परिवर्तनाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, रमाबाई रानडे यांसारख्या थोर स्त्रियांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रीला आत्मभान दिले. शिक्षणामुळे स्त्रीला प्रश्न विचारण्याची, निर्णय घेण्याची आणि स्वतःच्या आयुष्याचा विचार करण्याची ताकद मिळाली.
कायदे आणि घटनात्मक हक्कांच्या माध्यमातून स्त्री सुरक्षिततेसाठी आणि समानतेसाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली. स्त्री शिक्षणाचा अधिकार, घटस्फोट, वारसा हक्क, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळविरोधी कायदे, घरगुती हिंसाचारविरोधी कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा यामुळे स्त्रीला कायदेशीर आधार मिळाला.
स्वयं-सहायता गट, बचत गट, महिला मंडळे यांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला झाला. ग्रामीण भागात महिलांनी शेतीपूरक व्यवसाय, हस्तकला, बचत गटांमधून स्वतःची ओळख निर्माण केली. आर्थिक स्वावलंबनामुळे स्त्रीच्या निर्णयक्षमतेत वाढ झाली.

साहित्य, कला, चित्रपट, नाटक, माध्यमे यांच्या माध्यमातून स्त्रीच्या प्रश्नांना वाचा फोडली गेली. स्त्री अनुभव, तिचे दुःख, संघर्ष, स्वप्ने यांना समाजासमोर आणण्याचे काम लेखिका, कवयित्री, पत्रकार, कलाकार यांनी केले. यामुळे स्त्रीविषयी समाजाची दृष्टी काही प्रमाणात बदलली.
या सर्व प्रयत्नांनंतरही स्त्री अजूनही अनेक स्तरांवर असुरक्षित आहे. स्त्रीकडे पाहण्याची मानसिकता अनेकदा बदललेली नाही. कौटुंबिक पातळीवर निर्णयस्वातंत्र्य, करिअरची निवड, विवाह, मातृत्व याबाबत स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही.

ग्रामीण आणि शहरी, शिक्षित आणि अशिक्षित असा भेद न करता स्त्रीवरील हिंसा, लैंगिक छळ, मानसिक दडपण, कौटुंबिक अत्याचार सुरूच आहेत. कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी आणि सामाजिक स्वीकार यामध्ये मोठी दरी आहे.

सर्वप्रथम मानसिक परिवर्तन घडवणे अत्यावश्यक आहे. स्त्री परिवर्तन हे केवळ स्त्रियांचे काम नाही, तर पुरुष, कुटुंब आणि समाज यांचा एकत्रित सहभाग आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुला-मुलींमध्ये समानतेचे संस्कार रुजवले पाहिजेत. घरात कामाची विभागणी, निर्णयप्रक्रिया आणि जबाबदाऱ्या समान असाव्यात.
शिक्षण केवळ पुस्तकी न राहता संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित असले पाहिजे. शाळा-महाविद्यालयांमध्ये लैंगिक समानता, संमती (consent), मानवी हक्क, स्त्री-पुरुष संबंध यांवर खुले संवाद घडले पाहिजेत.

आर्थिक स्वावलंबनाला अधिक व्यापक स्वरूप देणे गरजेचे आहे. महिलांसाठी कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, उद्योजकतेसाठी सुलभ कर्ज व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम स्त्रीच अन्यायाविरुद्ध उभे राहू शकते.

कायदे केवळ कागदावर न राहता प्रभावीपणे राबवले गेले पाहिजेत. पोलिस, न्यायव्यवस्था, प्रशासकीय यंत्रणा या स्त्रीसंवेदनशील असल्या पाहिजेत. पीडित स्त्रीला दोष देण्याऐवजी तिला न्याय मिळेल, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे.

माध्यमे आणि सोशल मीडियाची जबाबदारीही मोठी आहे. स्त्रीला केवळ वस्तू किंवा आकर्षण म्हणून न मांडता तिच्या संघर्षाची, क्षमतेची आणि यशाची सकारात्मक मांडणी होणे गरजेचे आहे.

स्त्रियांनीही स्वतःबद्दल जागरूक होणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपले हक्क, आपली सुरक्षितता, आपले आरोग्य याबाबत सजग राहणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे ही सामूहिक शक्ती स्त्री परिवर्तनाला गती देऊ शकते.

स्त्री परिवर्तन म्हणजे केवळ कायदे, योजना किंवा घोषणांचा विषय नाही. तो समाजाच्या अंतःकरणाशी जोडलेला प्रश्न आहे. जेव्हा स्त्री मुक्तपणे विचार करू शकेल, निर्णय घेऊ शकेल आणि सुरक्षितपणे जगू शकेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडेल. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, संवेदनशीलता आणि सामूहिक जबाबदारी स्वीकारणे हीच काळाची गरज आहे.

मागील पंचवीस वर्षांचा डॉ. मीना यांचा सामाजिक प्रवास निश्चितच थक्क करणारा आहे. महिलांबद्दलची कळवळा, महिलांचे हक्क आणि महिलांचे आरोग्य यासाठी झटणाऱ्या डॉ. मीना आज त्या प्रत्येक स्त्रीचे प्रतिबिंब आहेत, जिला वाटते, ही परिस्थिती बदलली पाहिजे, इथे नवे वेगळेपण उभे राहिले पाहिजे.
डॉ. मीना जोशी यांच्या या चिरंतर टिकणाऱ्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा

डॉ.मीना जोशी
संपर्क क्रमांक 8806318116

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *