चंद्रपूर टॉप स्टोरी

काँग्रेसचा ‘मालक कोण?’—चंद्रपूरमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला!

वडेट्टीवार–धानोरकर आमनेसामने; महापालिकेच्या सत्तेभोवती घमासान

विशेष प्रतिनिधी | चंद्रपूर:चंद्रपूर महापालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेपेक्षा सत्तेच्या सूत्रांवरच अधिक रणकंदन सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. नगरसेवकांच्या पळवापळवीच्या आरोपांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता उघड संघर्षात रूपांतरित झाला आहे. आरोप–प्रत्यारोपांच्या फैरींनी हा वाद राजकीय ज्वालामुखीसारखा भडकत चालला आहे.
खासदार धानोरकर यांनी “काँग्रेसचे नगरसेवक उचलून नेण्याची काय गरज होती?” असा थेट सवाल उपस्थित करत वडेट्टीवारांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभं केल्यानंतर, आज वडेट्टीवारांनी आक्रमक आणि स्फोटक शब्दांत प्रत्युत्तर दिलं.
“कुठलाच नेता पक्षाचा मालक नसतो. स्वतःला मालक समजणाऱ्या नेत्याला कार्यकर्त्यांनी थोबाड रंगवले पाहिजे,” असं विधान करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
“मी कुणालाही उचलून नेलं नाही” — थेट पलटवार
नगरसेवकांची ‘पळवापळवी’ केल्याचे आरोप वडेट्टीवारांनी ठामपणे फेटाळले. “मी कुणालाही आणायला गेलो नाही. नगरसेवक स्वतःहून, स्वेच्छेने माझ्याकडे आले,” असं त्यांनी सांगितलं. उलट, खासदारांच्या कार्यकर्त्यांनीच हात पकडून नगरसेवकांना नेल्याच्या तक्रारी असल्याचं म्हणत, “कोण कोणाला घेऊन गेलं हे वन टू वन विचारून सत्य बाहेर आणावं,” अशी थेट मागणी त्यांनी केली.
“नेते येतात–जातात, पण कार्यकर्ते टिकून राहतात,” असं सांगत कोणीही स्वतःला पक्षाचा मालक समजू नये, असा खडा इशारा त्यांनी दिला. नगरसेवक व कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, ही जबाबदारी नेत्यांचीच असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
नागपूरची बैठक—तो़डगा की नवा रणसंग्राम?
वाद शिगेला असतानाच आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नागपूरला दाखल होत आहेत. याच बैठकीत या संघर्षावर तोडगा निघेल, असा दावा वडेट्टीवारांनी केला. मात्र तोडगा निघतो की संघर्ष आणखी पेटतो, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
“महापौर काँग्रेसचाच!” — सत्तास्थापनेचा ठाम दावा
सगळ्या गदारोळातही वडेट्टीवारांनी सत्तास्थापनेबाबत मोठा दावा करत सांगितलं की, काँग्रेससोबत इतर पक्षांतील चार ते आठ नगरसेवक येण्यास तयार आहेत. “चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर बसेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बी-टीमचे आरोप, जुने हिशेब
“मला भाजपची बी-टीम म्हटलं गेलं, पण निकालाने कोण कोणाची टीम आहे हे दाखवून दिलं,” असा टोला लगावत त्यांनी भूतकाळही उकरून काढला.
“काँग्रेसने आधी लोकसभेची उमेदवारी मलाच दिली होती. मी लढणार नव्हतो म्हणून मुलगी शिवानीसाठी उमेदवारी मागितली. त्यावेळी धानोरकरांचा पक्षात उदयसुद्धा झाला नव्हता,” असं सांगत वादाची सुरुवात कुठून झाली हे चंद्रपूरच्या जनतेला माहीत असल्याचं त्यांनी ठणकावलं.
“मृत अवस्थेतली काँग्रेस जिवंत केली”
आपल्या भूमिकेचं समर्थन करताना वडेट्टीवार म्हणाले, “माणसं येतात–जातात. पण मृत अवस्थेत असलेली काँग्रेस जिवंत करण्याचं काम मी केलं.” जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात कशी गेली, याकडेही त्यांनी बोट दाखवलं.
महापालिकेत खासदारांनी दिलेल्या उमेदवारांचा पराभव का झाला, याचं उत्तर धानोरकरांनी द्यावं, अशी थेट मागणी त्यांनी केली.
राजकीय पटावर काय संकेत?
हा वाद केवळ दोन नेत्यांपुरता सीमित नसून, तो चंद्रपूर काँग्रेसमधील नेतृत्व, नियंत्रण आणि सत्तेच्या केंद्रांवरचा संघर्ष उघड करतो. तोडगा न निघाल्यास महापालिकेची सत्ता मिळवतानाच पक्षांतर्गत जखमा अधिक खोल जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस चंद्रपूरमध्ये सत्ता उभी करणार, की अंतर्गत संघर्षातच अडकून पडणार?
उत्तर लवकरच स्पष्ट होईल.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *