नवी मुंबई:नेरुळ प्रभाग क्रमांक २० मधील भाजपात सुरू असलेल्या अंतर्गत असंतोषाला उघड स्वरूप मिळाले असून, भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नाईक गटाने स्वतःच्या समर्थकांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सचिव तसेच वसई-विरार व कोकणचे प्रभारी राजेश नरेश पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे नेरुळ आणि सीबीडी बेलापूर परिसरातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. यावेळी विजय कश्यप, अरुण पाटील, कुंदन पाटील, अरविंद गौड, आनंद गौड, राजकुमार गौड, आकाश गौड, धर्मेंद्र, साईनाथ साळुंखे आणि राहुल खरात यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
याचवेळी भाजप सहकार सेलचे सचिव व संयोजक प्रणित सिन्हा यांनीदेखील मूळ भाजप कार्यकर्त्यांना सातत्याने डावलले जात असल्याने शिवसेनेत प्रवेश केल्याची घोषणा केली. “पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असताना गप्प बसणे शक्य नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाकडून आणखी एक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सीबीडी पॅनल क्रमांक २८ ‘ब’ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या दिपाली सुदिप घोलप यांना शिवसेनेचे पुरस्कुत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.




