उल्हासनगर , दि . ४ प्रतिनिधी : १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल उर्फ अँड विठ्ठल लक्ष्मण कोतवाल यांच्या बलिदान दिनानिमित्त क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल स्मारक समिती, उल्हासनगर ४ च्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी क्रांती ज्योत मशाल रॅली काढून भाई कोतवाल यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
उल्हासनगर कँम्प ४ मधील हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक मार्गावरून ही रॅली लालचक्की चौक ते छत्रपती शाहू महाराज उडाण पुल मार्गाने उल्हासनगर रेल्वे स्टेशन पासून राजमाता जिजाबाई उद्याना समोरून मार्गस्थ होऊन पुन्हा हुतात्मा वीर भाई कोतवाल चौकात पोहचली.उदय पाटील, रामेश्वर गव्हाणे आणि यश मिस्त्री या तिन्ही युवकांनी क्रांती ज्योत मशाल रॅलीचे नेतृत्व केले.क्रांतीकारकांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या रॅलीच्या आयोजनमुळे संपूर्ण परिसरात क्रांतीचे वातावरण पसरले होते.अमर रहे अमर रहे भाई कोतवाल अमर रहे या घोषणेने आसमंत दुमदुमून गेला होता.देश पारतंत्र्यात असताना क्रांतिकारकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते स्वातंत्र्य जपण्याची आणि अधिक समृध्द करण्याची जबबादारी आपली आहे,असं आवाहन मनोज कोरडे यांनी केले.
यावेळी २ जानेवारी १९४३ रोजी सकाळी ६.०२ मिनिटांनी सिद्धगडावर झालेल्या रणसंग्रामात जुलमी ब्रिटीश राजवाटीपासून भारत मातेला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात येऊन आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष मनोज कोरडे,उपाध्यक्ष संदीप सायखेडे, कोषाध्यक्ष संतोष खंडागळे, उपकोषाध्यक्ष मधुकर कोकाटे ,कार्याध्यक्ष अंकुश श्रीखंडे, उपकार्याध्यक्ष संदिप रावताळे,देखभाल समितीचे दिनेश सोनावळे,सल्लागार राजन चव्हाण तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.यावेळी समितीच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी आणि नागरिकांना चहा वाटप करण्यात आला.




