पनवेल

गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त खारघरमध्ये ‘हिंद-दी-चादर’ भव्य कार्यक्रम; सर्व धर्म समानतेचा संदेश – मंत्री माधुरी मिसाळ

पनवेल (प्रतिनिधी) सर्व धर्म एकच आहे आणि जो दुसऱ्या धर्माचा सन्मान करतो तो धर्म नेहमी मोठा होतो, असे प्रतिपादन राज्याच्या अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी आज खारघर ओवे येथे केले. हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्ताने खारघर सेक्टर १९ येथील मैदानावर दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी ;हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्य मंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार प्रशांत ठाकूर तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘नगारा फतेह दा’ या धार्मिक गीताचे लोकर्पणही यावेळी झाले. यावेळी उपस्थितांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत कोकण विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, समाजाचे नेते जसपाल सिंग सिद्धू, हॅप्पी सिंग, मलकीत सिंग, हरजीत सिद्धू, समन्वयक रामेश्वर नाईक, महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रिया मुकादम, नगरसेवक नगरसेविका, शासकीय अधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशासाठी बलिदान देणाऱ्यांची गाथा समाज आणि युवा पिढीला ज्ञात झाली पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन आहे. देशप्रेम कायम जागरूक ठेवण्याचे काम मोदीजी करत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष दिले असून आमदार प्रशांत ठाकूर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच सर्व समाजाचे नेते, प्रतिनिधी, विविध संस्था संघटना आणि विशेषत्वाने शासकीय अधिकारी, पदाधिकारी काम करत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाच्या भव्य दिव्य आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे आभार व्यक्त केले. इ.स. १६७५ मध्ये औरंगजेबाच्या काळात काश्मिरी पंडितांवर जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा दबाव टाकण्यात आला. त्यांच्या संरक्षणासाठी गुरु तेग बहादुर यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्या महान बलिदानामुळे त्यांना “हिंद दी चादर” असे म्हटले जाते. त्यामुळे देशासाठी बलिदान देणारे गुरु तेग बहादुर यांचे या कार्यक्रमातून कायम स्मरण होत राहणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *