खरी खरी संपादकीय

मुंबईतही सुयश

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भाजपने धवल सुयश मिळवलेले आहे. शहरी भागात भाजप आणि भाजपच पहिल्या क्रमांकावर आहे हे आता सिद्ध झालेले आहे. मुंबई शहर केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतात ते उगीचच नाही. मुंबईला या निवडणुकीच्या निकालांनी वेगळे नेतृत्व दिलेले आहे कारण या शहरात महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंची जोडी यांची लढाई निश्चितच दोन्ही पक्षांनाही वेगवेगळे मार्ग दाखवणारी ठरली.

२५ वर्षे शिवसेनेने मुंबईवर अधिराज्य केलेले होते. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी एक वक्तव्य केले होते, त्यामध्ये मराठी जनतेला आपला स्वाभिमान दाखवण्याचे त्यांनी जणूकाही आव्हानच केले होते. काँग्रेसला तर असा भाषिक संघर्ष तेव्हाही करता येत नव्हता आणि आताही त्यांना करता आला नाही त्यामुळेच की काय मोठ्या ठाकरेंसोबत आताच्याबरोबर काँग्रेसने मुंबईत प्रबळाचा नारा दिला. काँग्रेसने शिवसेनेबरोबर आघाडी करून २०१९ आली सत्ता स्थापन करण्यात आली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना त्यांच्याच पक्षातील सहकाऱ्यांनी अक्षरशः गोत्यात आणले आणि त्यानंतर आरोप झाले.

मग ते खोक्यातून भरून पैसे आणले, गद्दार झाले अशा प्रकारच्या आरोपांनी काही फरक पडला नाही. आता मुंबईचे निकाल पाहिल्यावर, ती शिवसेना आणि ही शिवसेना यांचे मुंबईतील मराठी माणसांचे प्रेम दिसून आलेले आहे असे म्हणता येणार नाही काय ? राज्याचे शिलेदार देवेंद्र फडणवीस यांनीही जुनी शिवसेना वश होत नाही हे पाहून फुटलेल्या शिवसेनेला चिन्हासहित महाराष्ट्रात प्रस्थापित केले. वरिष्ठांनीही म्हणजेच भाजप मधल्या वरिष्ठांनीही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले. एवढे सर्व करूनही मुंबईतील प्रस्थापित केलेल्या शिवसेनेला ठाकरे बंधूंच्या शिवसेनेपेक्षा अपेक्षेपेक्षा कमी जागाही जिंकता आलेल्या नाहीत हे वास्तव आहे. आज देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत भाजपने आपला झेंडा रोवला आहे म्हणजे केंद्रात भाजप सरकार, आता महाराष्ट्रात राज्य भाजपचे, सर्वात मोठ्या महापालिकेत म्हणजे मुंबईत महापौर भाजपचा, एकूणच सत्ता भाजपाची आणि त्यासोबत शिवसेनेच्या चटणीमुळे जेवणाचा स्वाद खमंग झाल्याचे म्हणता येईल.

खरे तर ठाकरे बंधू यांनी एक गोष्ट लक्षातच घेतली नाही ती गोष्ट म्हणजे मराठी माणूस शिवसेनेत आहे तसेच जन्माने मराठी नसलेले परंतु मराठी बाणा जपणारे मोठ्या प्रमाणावर सदस्य ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. वेगळ्या शब्दात सांगायचे तर आता मुंबईत मराठी माणसाला इतरांबरोबर युती करूनच राज्य करता येईल. आजच्या निकालांनी मुंबईच्या भाषिक राजकारणाला नवे वळण लावलेले आहे. तुम्ही कितीही नावे ठेवली तरी आज मुंबईत अमराठी लोक बहुमतात आहेत हे चित्र उघड आहे. काँग्रेस बरोबर दोस्ती करून उद्धव रावांना फार मोठा फायदा झाला असता असे म्हणता येणार नाही. पण राज साहेबांपेक्षा त्यांच्याबरोबर आघाडी केली असती तर काही जागा वाढल्या असत्या असे बरेच तज्ञ लोक म्हणतात.

राज साहेबांनी शिवतीर्थापासून सगळ्याच ठिकाणी उत्तम भाषण करून जे जे मुद्दे मांडले त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला, पण नेहमी प्रमाणेच मतदानातून प्रतिसाद मिळाला नाही. या निकालांनंतर आता आजपासून दमदार विरोधी पक्ष म्हणून काम करणे आणि भविष्यामध्ये मुंबईकरांच्या अपेक्षांना आणि समस्यांना वाचा फोडणे हे त्यांचे काम असणार आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या सोबत असलेल्या पक्षांना म्हणजेच महायुतीला जो काही विजय मिळाला आहे. त्यामुळे त्या पक्षांनाही आपले पाय मुंबईत अधिक घट्टपणे उभे राहण्यासाठी काही गोष्टी करून आपले पाय अजून मजबूत करावयाचे आहेत. नागपूरच्या पट्ट्याने लीलया विजय मिळवून केवळ आपल्या पक्षालाच नाही तर स्वतःलाही निर्विवाद नेता म्हणून प्रस्थापित केलेले आहे. ही त्यांच्या यशाची पायवाट त्यांना अधिक उज्ज्वल करेल यात शंका नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *