मुरबाड, दि.२०,प्रतिनिधी:मुरबाड तालुक्यातील आदिवासी बहुल भागात काही गावांमध्ये जाण्यासाठी आतापर्यंत रस्त्यांची अवस्था बिकट असल्यामुळे, स्थानिक नागरिकांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
गेल्या १०–१५ वर्षांपासून माळ जिल्हा परिषद गटातील माळ, जांभूळवाडी, वडाचीवाडी, सुकळवाडी, भांगवाडी व वाकलवाडी या गावांतील नागरिकांना रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. येथील आदिवासी नागरिकांना दगड–गोट्यांच्या पायवाटेवरूनच पायपीट करून जावे लागते, अशी कठीण परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून जाणवत आहे.
तरी हा रस्ता होत नसल्याने येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत स्थानिक ग्रामस्थ मतदान करणार नाहीत असे नाव न घेण्याच्या अटीवर येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.




