मिळणाऱ्या शिक्षणाचे ज्ञानात रुपांतर होऊन विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाचा मतितार्थ समजावा आणि त्याचा थेट संबंध जीवनाशी जोडता यावा, यासाठी संजीवन विद्यालय पाचगणीचे प्राचार्य धनंजय शिरूर, स्वयंअध्ययन, आशयगर्भित शिक्षण,रचनात्मक शिक्षणावर भर देतात. ते म्हणतात की, शिक्षणातून केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता शारीरिक, मानसिक , बौद्धिक विकासासोबत अध्यात्मिक आणि कौशल्य विकास साधला तरच विद्यार्थ्यांचे जीवन पूर्ण घडते असे परखड मत मांडणारे डॉ. धनंजय शिरूर विद्यार्थ्यांमधून सक्षम, स्वावलंबी व कर्तृत्ववान माणूस घडविण्याची कास बाळगून आहेत. त्यांच्या या अभिनव आणि उत्तम शिक्षणाच्या संरचनेतून संजीवन विद्यालय पाचगणी देश पातळीवर नावलौकिकास आले आहे.
आताचे शिक्षण म्हणजे केवळ मार्कांसाठी चाललेली स्पर्धा आहे. या स्पर्धेतून केवळ यंत्रे निर्माण होऊ शकतात पण आयुष्याला लागणारी शिदोरी नाही. त्यासाठी विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून आनंददायी व अनुभवातून शिक्षण देण्याची गरज आहे असे विचार बाळगणारे प्राचार्य धनंजय शिरूर यांचा जन्म सातलिंगप्पा शिरूर आणि शांताबाई शिरूर यांच्या पोटी झाला. शून्यातून जग निर्माण करणाऱ्या वडिलांनी खेड्यातून सोलापूर शहरात येऊन, कमवा आणि शिका या धर्तीवर अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले. क्लर्क म्हणून लागलेले वडील सहकार्याकडून पुस्तके घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे आणि परीक्षा उत्तीर्ण होऊन ते इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये सीनियर डिव्हिजनल अकाऊंटस् ऑफिसर म्हणून रुजू झाले. वडिलांचे हे कष्ट, त्यांची शिकवण व आईचा इंग्रजी माध्यमाचा आग्रह या जडणघडणीतून मी घडलो आणि माझं उत्तम शिक्षण झाले असे ते अभिमानाने सांगतात.
बीएससी मध्ये वनस्पतीशास्त्रात स्पेशलायझेशन केल्यानंतर त्यांनी सायटोजेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या विषयात एमएससी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बी.एड आणि एम.एड चे शिक्षण घेतले. आता ते वनस्पती शास्त्र मध्ये “अनेटॉमिकल स्टडीज इन सेरोपेजिया स्पेसिज् ऑफ इंडिया” या शोध प्रबंधावर काम करीत आहे. ते भाऊक होऊन सांगतात की, बीएससी ला असताना डॉक्टर राजाभाऊ ढेपे यांच्या प्रभावशाली ,आणि विद्यार्थ्यांच्या कलेने शिकविण्याचा, शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील अनेक मातब्बर प्राध्यापकांच्या व समविचारी मित्रमंडळींच्या शिकवणीचा माझ्यावर विशेष प्रभाव पडला. आणि त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यात गोडी निर्माण झाली. या शिकविण्याच्या गोडी मुळे ते अकरावी व बारावीचे ट्युशन वर्ग घेऊ लागले. २००० या वर्षी ते सीनियर कॉलेजला तासिकेवर प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. आणि त्यांचा शिक्षकी पेशा सुरू झाला. या प्रवासात त्यांनी अनेक शाळा व महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम बघितले. पण पाचगणीतील निसर्गरम्य वातावरण, शाळेतील शिस्तबद्ध शैक्षणिक संरचना आणि त्यांच्या कार्यतत्पर बुद्धीला तेथील संस्थेच्या अध्यक्षा शशीताई ठकार आणि विश्वस्त अनघा देवी यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे ते संजीवन विद्यालय पाचगणीला प्राचार्य म्हणून रुळले.
प्राचार्य म्हणून या निवासी शाळेच्या संपूर्ण अध्ययन अध्यापन प्रक्रियेची घडी यांनी नीट बसविली. सकाळी 5.30 ते रात्री 9.30 पर्यंत विद्यार्थ्यांना कडक शिस्तीतून आणि तेवढ्याच स्व विकासाच्या अभ्यास व अभ्यास पूरक ऍक्टिव्हिटीज पूर्ण कराव्या लागतात. यामध्ये शारीरिक व्यायाम, खेळ, शिक्षकांच्या मदतीने स्वयंअध्ययन, नियमित वर्ग, उपचारात्मक वर्ग, ध्यान, अवांतर वाचन, गप्पागोष्टी यांचा अंतर्भाव असतो. हे सर्व करीत असताना विद्यार्थ्यांतील अभ्यासातील कमतरता त्यांचे कच्चे दुवे या वर विशेष शिक्षकांकडून लक्ष देऊन त्यांना वरच्या पातळीपर्यंत आणण्यात येते. याशिवाय जे विद्यार्थी उपजत हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांकडून ऑलिंपियाड सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. जिथे विद्यार्थ्यांना कौन्सिलिंग ची गरज आहे अशा ठिकाणी त्यांचे व त्यांच्या पालकांचे कौन्सेलिंग डॉ. शिरिषा साठे यांच्यामार्फत केले जाते. याशिवाय माजी विद्यार्थी, त्यांचे पालक यांना बोलवून तसेच तज्ञ व्यक्तींना बोलावून अनुभव आणि करिअर मार्गदर्शन त्यांना दिले जाते.
कन्सेप्ट बेस्ड लर्निंग, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, एक्स्पेरिन्शियल लर्निंग या त्रीसूत्रीवर विशेष भर असल्याने ते प्रत्येक वर्गाला अभ्यासक्रमानुसार असलेल्या 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्किल्सवर विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी करण्यास देतात. गरीबी, स्त्री पुरुष समानता, भूक, आरोग्य, शिक्षण यासारख्या विषयाबाबत सखोल जाणून घेण्यासाठी त्यांना त्या क्षेत्रात जाऊन स्वयं अध्ययनाची संधी देण्यात येते. सत्य परिस्थिती आणि समस्या जाणून घेतल्यावर ते त्यातून घोषवाक्य, गीत, कथा, नृत्य, लहान लहान स्किट्स बसवितात आणि शाळेच्या पटांगणावर त्याचे सादरीकरण करण्यात येते. यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी आणि शिक्षक वर्ग त्यांना प्रोत्साहन देतात. कृतीतून आधारित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होऊन ते त्यांच्या हृदयापर्यंत भिडते असे शिरूर सर म्हणतात. हीच पद्धत अभ्यासक्रमासाठी ही वापरली जाते.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे म्हणून संजीवन विद्यालय गेल्या वीस वर्षांपासून वोकेशनल कोर्सेस चालवीत आहेत. प्राचार्य शिरूर स्वतः याचे कॉर्डिनेटर होते. ऑटोमोबाईल रिपेरिंग, मोबाईल रिपेरिंग, कारपेंटरी, पेंटिंग, वूड क्राफ्ट, बांबू क्राफ्ट, पॉटरी यासारखे कोर्सेस चालविल्या जातात. याशिवाय विद्यार्थ्यांना ऑरगॅनिक शेती व त्यातील आधुनिक तंत्रज्ञान याचे ज्ञान मिळावे याकरिता शाळेच्या नर्सरीमध्ये विविध फळे व भाज्या उगविल्या जातात. त्यांच्यासाठी गार्डनिंग हा विषय ही चालविला जातो. लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन डॉ.चित्राताई दाभोळकर या येथे येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. धनंजय शिरूर हे जीवशास्त्र शिकवित असल्याने ते सुद्धा या अध्यापनात मदत करतात.
शिक्षण क्षेत्रामध्ये खेळ सुद्धा महत्त्वाचा असल्याने शाळेमध्ये विविध खेळांसाठी सुसज्ज असे मैदान आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना लॉन टेनिस, हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब, दांडपट्टा, लाठीकाठी, धनुर्विद्या, मुलींना सेल्फ डिफेन्स शिकविले जातात. विशेष प्रशिक्षित कोचेस कोचिंग साठी असल्याने विद्यार्थी राज्य पातळी व राष्ट्र पातळीवर चमकले आहे. विद्यार्थ्यांचा मानसिक व व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात.
विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्याची आवड निवड, येणाऱ्या भाषा, त्याच्यातील कौशल्य, कच्चे दुवे, विषयानुसार हुशारी आधीच हेरली जाते. आणि त्याच्या गरजेनुसार विशेष शिक्षक त्याच्याकडे लक्ष पुरवितात आणि जिथे काउंसलिंग ची गरज आहे तेथे विद्यार्थ्यांना व पालकांना कौन्सिलिंग दिली जाते. यामुळे प्राचार्य शिरूर यांच्या शिस्तबद्ध सुशासन आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणालीतून ही शाळा देश पातळीवर नावारूपास आली आहे. येथे देशातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिकण्यास येतात. एवढेच नाही तर येथून निघालेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, आॅनथरो प्रोनर बनून मोठ्या हुद्द्यावर काम करीत आहे. हे सर्व विद्यार्थी मोठ्या अभिमानाने आणि भाऊक होऊन प्राचार्यांशी कृतज्ञता व्यक्त करतात की त्यांच्या सुशासन व प्रशासन यामुळे आम्ही आमच्या कार्यक्षेत्रात उत्तम समायोजन करीत आहोत व प्रगती साधत आहोत.
शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व जडणघडणीशिवाय संजीवन विद्यालय सामाजिक दायित्व जोपासण्यातही मागे नाही. लॅटरल एज्युकेशन अंतर्गत या शाळेने आसपासच्या 14 गावांना दत्तक घेतले आहे. या चौदा गावातील अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून गोष्टी आणि गाण्यातून त्यांना शिक्षण दिले जाते. यासाठी त्या गावातील जिल्हा परिषद शाळा निवडलेल्या आहेत. एका तासासाठी या अंगणवाडी सेविका व मुलांना पुस्तके उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच या अंगणवाडी सेविकांचे आर्थिक उन्नयन व्हावे यासाठी त्यांना कापडी पिशव्या, मोबाईल कव्हर, ज्यूट बॅग बनविण्या साठी प्रशिक्षण दिले जाते. आणि याची विक्री करून मिळणारी मिळकत त्यांना दिली जाते.
शिरूर सरांच्या अथक परिश्रमातून, संकल्पनेतून आणि विद्यार्थ्यांमध्ये जीवन जगताना आवश्यक असे कौशल्य निर्माण करण्यासाठी त्यांची चाललेली धडपड यातून संजीवन विद्यालय विद्यार्थ्यांसाठी खरोखरच संजीवन बनलेले आहेत. ते म्हणतात की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संजीवन विद्यालय हे स्किल कोर्सेस वर भर देऊन विद्यापीठामध्ये परावर्तित करण्याकडे वाटचाल करीत आहे आणि खेळाला विशेष प्राधान्य देऊन अनेक उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे व त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत.
या लेखाच्या मार्फत ते मुलांना संदेश देतात की शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून ते आपले विचार, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे. अभ्यासासोबतच शिस्त, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि सकारात्मक दृष्टिकोन हे गुण आत्मसात करा. समाजमाध्यमाचा वापर हितकारी गोष्टीसाठी करा.
अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. यश मिळवण्यासाठी सातत्य, आत्मविश्वास आणि मेहनत आवश्यक असते. आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन मनापासून स्वीकारा, पालकांचा आदर करा आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक बनण्याचा संकल्प करा. समाज व विद्यार्थ्यांची पिढी घडवून राष्ट्र उभारणीच्या त्यांच्या या कामात त्यांना सदैव यश लाभो यासाठी आमच्या शुभेच्छा.





