अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत ‘सत्तासंघर्ष’? तटकरे-पटेलांच्या ‘खेळी’वर दानवेंचा जहरी प्रहार; ‘स्वार्थाचा’ तो आरोप कुणाकडे?
राजकीय विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्र अद्याप अजितदादांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेला नाही, तोच राज्याच्या राजकारणात ‘पॉवर गेम’ला हिणकस वळण लागले आहे. सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य शपथविधीवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वावर तोफ डागली आहे. “सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात,” असे खळबळजनक विधान करत दानवे यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
‘त्या’ घाईमागे नेमकं कारण काय? दानवेंचा टोकदार सवाल
अजितदादांच्या एक्झिटला अवघे चार दिवस झाले असतानाच सत्तेची पदे वाटली जात असल्याबद्दल दानवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “कुटुंबात आणि राज्यात अजूनही दुखवटा आहे, अशा वेळी खुर्चीसाठी होणारी ही धावपळ संतापजनक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तटकरे आणि पटेल यांनी केवळ आपली मंत्रिपदे आणि पक्षावरील ताबा सुरक्षित करण्यासाठी सुनेत्रा वहिनींना ‘ढाल’ म्हणून वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शरद पवारांच्या ‘विलीनीकरण’ अस्त्रामुळे नेत्यांची झोप उडाली?
शरद पवारांनी आज सकाळी केलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटाचा आधार घेत दानवे यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. जर १२ तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, तर मग आताच वेगळ्या शपथविधीची ही घाई कशासाठी? यावर भाष्य करताना दानवे म्हणाले: “तटकरे आणि पटेलांना एक अनामिक भीती सतावत आहे. जर शरद पवार पुन्हा सक्रिय झाले, तर त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल. याच भीतीपोटी त्यांनी अजितदादांच्या इच्छेविरुद्ध जाऊन सत्तेचा हा नवा डाव मांडला आहे.”
राजकीय नैतिकतेचा अंत?
अजितदादांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावना अद्याप अनावर आहेत, तरीही मुंबईत मंत्रिपदाच्या आणि शपथविधीच्या चर्चा रंगत आहेत. “या नेत्यांना ना नात्यांचे सोयरसुतक उरले आहे, ना निधनाचे गांभीर्य,” असे म्हणत दानवे यांनी थेट राजकीय नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
—
Deepak Kaitke




