महासागर डिजिटल चर्चासत्रात मान्यवरांची रोखठोक चर्चा
स्वप्निल दुधारे – मुंबई:मालेगावच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांसोबत समकक्ष असल्याचा केला आणि महाराष्ट्रभरात भाजपाने आंदोलनाचा सपाटा लावला.
काल पुण्यातील काँग्रेस भवन समोर भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये एकमेकांवर दगडफेक केल्यामुळे अनेकांना दुखापत झाली तर पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले.
यालाच अनुसरून दैनिक महासागराच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.
या चर्चासत्रात शेतकरी नेते तथा निर्भीड नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विजय जावंदिया यांचा सहभाग होता त्याचबरोबर दैनिक महासागर चे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक आणि नाशिकचे निवासी संपादक तथा वरिष्ठ पत्रकार जयंत महाजन यांचा देखील सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासागर डिजिटलचे संपादक स्वप्निल दुधारे यांनी केले.
देशातील शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती असून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या देठाला देखील हात नाही लावला पाहिजे अशी भूमिका घेत होते तर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय आहे.. असा सवाल त्यांनी विचारला.आज शेतकरी मेटाकुटीला आला असून अमेरिकेचा भारतासोबत झालेला करार ही फक्त चर्चा झाल्यानंतरच कपाशीचे भाव 400 ते 500 रुपयांनी पडले असं सांगत त्यांनी हे निव्वळ राजकारण आहे असे ताशेरे ओढले, तर या चर्चासत्रात दैनिक महासागर चे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक यांनी सांगितलं की महाराष्ट्रात आज बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे अनेक प्रश्न आ वासून उभे असताना एखाद्या विषयावर फक्त राजकारण करणं हे कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी केला.
दैनिक महासागर चे नाशिकचे निवासी संपादक प्राध्यापक जयंत महाजन यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं की टिपू सुलतानचा फोटो नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या महापालिकेच्या उपमहापौरांनी लावला होता आणि यावरती विरोध दर्शवला नंतर तो फोटो तात्काळ त्यांनी काढला देखील होता पण त्यानंतर हर्षवर्धन सकपाळ यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात जाती-जातीचे राजकारण करण्यात येत आहे आणि हे राजकारण योग्य नाही तर उलट सरकारने विकासाकडे लक्ष द्यायला हवं अशी टीका देखील महाजन यांनी केली.


