डिजिटल चर्चासत्रात सत्य परिस्थितीवरील आढावा
स्वप्निल दुधारे,मुंबई :- निवडणुका होण्यापूर्वीच बिनविरोध उमेदवार निवडून येत असल्याच्या बातम्या आता सध्या जोर धरत आहेत. आजवर 29 महापालिकेत जवळपास 69 उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि मतदार वर्ग मात्र संभ्रमात पडला.
मतदारांनी मतदान न करता उमेदवार निवडूनच कसे येतात हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. असंच जर सुरू राहिलं तर उद्या निवडणुका घ्यायचीच गरज पडणार नाही की काय असं देखील आता मतदार राजाला वाटायला लागलं. यालाच अनुसरून आज महासागर डिजिटलच्या माध्यमातून “बिनविरोध निवडणुका होतात कशा ? दबाव की अमिष ? या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या चर्चासत्रात दिल्ली येथून ज्येष्ठ विश्लेषक आणि समुपदेशक डॉ.विजय दहिफळे, संभाजीनगर वरून अजित पवार गटाचे बाजीराव सवंडकर, नांदेड वरून ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक प्रा. डॉ. सुहास पाठक तसेच संशोधक तथा अकोला येथून उद्योजक वैभव वानखेडे यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता.
या चर्चासत्राच निवेदन दैनिक महासागर चे मुख्य समूह संपादक संदीप काळे यांनी केलं.
या चर्चा दरम्यान डॉ. विजय दहिफळे यांनी अशा निवडणुकीवर निषेध व्यक्त करत आपलं मत व्यक्त केलं की जर अशा पद्धतीने बिनविरोध निवडणुका झाल्या तर त्या आपल्या लोकशाहीसाठी घातक ठरू शकतात. तर बाजीराव सवंडकर यांनी पैशाच्या जोरावरती ह्या सगळ्या निवडणुका लढवल्या जात असल्याचा घनाघात केला.
चर्चदरम्यान प्रा.डॉ.सुहास पाठक यांनी चर्चा दरम्यान सांगितलं की खरंतर मतदान हा जनतेच्या मनातील एक आवाज असतो त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर निवडणूक प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे असं बोलत त्यांनी बिनविरोध निवडून आलेल्यांना घरचा आहेर दिला. वैभव वानखेडे यांनी या चर्चेत सांगितलं की मतदानाचा अधिकार हा लोकशाहीने दिलेला महत्त्वपूर्ण अधिकार असून तोच अधिकार जनतेकडून हिरावून घेतला जात आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतूनच उमेदवार निवडून यावा असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं.



