मा.महापौर निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
नागपूर, ता.२० : शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूकडून सर्वसामान्य नागरिकांना वाढीव बिल प्राप्त झाल्याच्या विविध तक्रारी प्राप्त होत आहेत. वाढीव बिलाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांनावर होत असल्याने त्यांचा रोष ऑरेज सिटी वॉटरवर वाढत चालला आहे, तरी ज्या नागरिकांना वाढीव बिल प्राप्त झाले आहेत त्यांना तत्काळ ओसीडब्ल्यूने बिलामध्ये दुरुस्ती करून द्यावी असे निर्देश मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आमदार श्री प्रवीण दटके यांच्या सोबतच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
नागपूर महानगरपालिकेतील पाणी समस्या तसेच ओसीडब्ल्यूचे वाढते पाणी बिल या संदर्भात मा. महापौर यांच्या कक्षात बैठक घेण्यात आली. बैठकीत आमदार श्री. प्रवीण दटके यांनी नागरिकांसमवेत पाणी बिलासंदर्भात महापौर यांच्याशी चर्चा केली. यावेळी बैठकीत उपमहापोर श्रीमती लीला हाथीबेड, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, प्रभाग क्र. १८ (अ) चे नगरसेवक श्री. सुधीर उर्फ बंडू हरिदास राऊत, प्रभाग क्र. १८ (ब) च्या नगरसेविका श्रीमती सारिका सुनिल नांदुरकर, प्रभाग क्र. १८ (क) च्या नगरसेविका श्रीमती. वैशाली विलास उदापुरकर (टोळ), प्रभाग क्र. १८ (ड)चे नगरसेवक श्री. सचिन प्रकाशराव नाईक, मनपाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, ओसीडब्ल्यूचे श्रीमती उषा लतकरे, श्री.प्रवीण सरण यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत आमदार श्री. प्रवीण दटके यांनी वाढीव बिलामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली. मीटर चोरी जाणे, पाचपटीने बिल वाढवून येणे, तक्रार करूनही कारवाई न होण्याबद्दल श्री. दटके यांनी सविस्तरपणे चर्चा केली, यावर दूषित पाण्याच्या समस्येच्या तक्रारींचे लवकरात लवकर पुढील सात दिवसांच्या आत निराकरण करण्यात यावे. पाण्याच्या बिलातील पाचपट वाढीव देयकांमध्ये तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिले.




