राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन;पोर्टलवर सुधारणा करण्याची राजू भोस्कर यांची मागणी
रामटेक ( प्रतिनिधी )ई-केवायसी करूनही तालुक्यातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याचे मिळत नसल्याने संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजू भोस्कर यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना लाडक्या बहिणींसह भेट देऊन पोर्टलवर सुधारणा करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी लाभधारकांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची तारीख निश्चित केली होती. या कालावधीत पारशिवनी तालुक्यातील बहुतेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. परंतु आमडी येथील वनिता महादेव बोरकर,कांचन सुरेश भोस्कर, कांता डाकीराम झाडे, कुंदा नरेश भोस्कर, करिष्मा कमलेश झाडे, सारिका विलास लोणारे, मीना मधुकर झाडे, विमल सुरेश चटप, रंजीत सेवक रामटेके, किरण रवी कामडे, प्राची रवींद्र कामडे, अश्विना ज्ञानेश्वर खिरेकार, आचल राकेश खिरेकार आणि इतर महिलांच्या खात्यात मागील दोन महिन्यांपासून योजनेचे पैसे जमा करणे बंद केले आहे. आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या शेतमजूर आणि कामगार महिलांना शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. पात्र लाभधारक महिलांना ई-केवायसी करूनही किंवा इतर कारणांमुळे वंचित राहण्याची स्थिती आहे.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आयुक्त महिला व बालकल्याण विकास मा.रा.पुणे यांना दिनांक १२/१/२०२६ ला या संदर्भानुसार मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजने मध्ये शासन निर्णयानुसार ई- केवायसी करताना अनेक महिलांची ई-केवायसी चुकीची झालेली असुन सदर चुकीची ई- केवायसी सुधारित करण्याकरीता पोर्टलवर पत्र दिल्याची माहिती दिली. सुधारित पोर्टल आल्यावरच सर्व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी केलेल्या महिलांना लाभ मिळने सुरू करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या वेळी दिली.




