माणूसपणाची पाऊलवाट

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार – गजानन मोरे

मोठ्या परिश्रमातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून उत्तम गुण मिळवूनही, केवळ प्रवेश परीक्षांचे जटिल नियम व किचकट पद्धतीविषयी अज्ञान असल्याने अनेक विद्यार्थी आपले उत्तम भविष्य घडविण्यापासून वंचित राहू शकतात. ही बाब जेव्हा गजानन मोरे यांनी हेरली, तेव्हा समुपदेशनाद्वारे (काउंसलिंग) विद्यार्थी व पालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सनबीम एज्युकेशन प्रवेश प्रक्रिया केंद्राची स्थापना केली.

या केंद्रामार्फत फॉर्म भरण्यापासून ते प्रवेश प्रक्रियेपर्यंत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याचे कार्य ते करतातच; शिवाय त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे खरे शिल्पकार ठरले आहेत.सनबीम एज्युकेशन प्रवेश प्रक्रिया केंद्राचे संस्थापक गजानन मोरे यांनी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील कुपटा या गावी प्राथमिक शिक्षण घेतले, तर जालना जिल्ह्यातील मंठा येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षणासाठी ते नांदेड येथे आले आणि येथेच कम्प्युटर अप्लिकेशनमध्ये बीसीए पूर्ण केले. सोबतच ओपन युनिव्हर्सिटीमधून बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले.

शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वावर शिक्षण घेत असतानाच त्यांनी नांदेड येथील प्रचलित बारावी विज्ञान शाखेच्या खाजगी ट्युशन वर्गामध्ये नोकरी पत्करली. या ठिकाणी ते विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे, नोट्स काढणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, निकाल लावणे यांसारखी संगणकीय कामे करीत होते. या कामातून विद्यार्थी व पालकांशी निगडित समस्यांशी त्यांचा जवळून संबंध आला.

2007-08 पासून बारावी व बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होऊ लागल्या. याबाबत जागृती नसल्याने अडचणीत असलेले विद्यार्थी व पालक मार्गदर्शनासाठी मोरे यांच्याकडे मोठ्या आशेने येऊ लागले. गजानन मोरे आपल्या ज्ञानाचा व माहितीचा त्यांना फायदा करून देऊ लागले. यातून त्यांना जाणवले की विद्यार्थी आणि त्याच्या करिअरमधील मुख्य दुवा म्हणजे समुपदेशन (काउंसलिंग) होय.
विद्यार्थ्यांचे शिक्षण व करिअर घडविण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असा संकल्प त्यांनी केला आणि 2008 साली सनबीम एज्युकेशनची स्थापना केली.

जीव ओतून काम करण्याची तयारी आणि विद्यार्थी व पालकांशी जुळलेले स्नेहबंध यामुळे सुरुवातीलाच त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला. या यशानंतर त्यांनी खाजगी ट्युशन क्लासेसचे काम पूर्णपणे बंद करून सनबीम एज्युकेशन या संस्थेवर लक्ष केंद्रित केले.

ते सांगतात की त्यांनी जेव्हा काम सुरू केले, तेव्हा एमबीबीएस व इंजिनिअरिंगसाठी संपूर्ण भारतात विविध विद्यापीठांमार्फत सुमारे 52 वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेतल्या जात होत्या. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण व त्यांचा कल लक्षात घेऊन एमबीबीएस, बी.ए.एम.एस., फार्मसी, बीडीएस, एमबीए, अभियांत्रिकी अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी फॉर्म भरण्यापासून ते अंतिम प्रवेश प्रक्रियेपर्यंत ते विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करीत असत.

2017 नंतर सीईटी, जेईई, नीट या परीक्षा सुरू झाल्या. मात्र या परीक्षांचे नियम दरवर्षी बदलत असतात. या बदललेल्या नियमांची माहिती ते सातत्याने घेत असतात. यावर्षी किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले, कटऑफ किती आहे, विद्यार्थ्याला प्राप्त झालेले गुण यामधील तंतोतंत गणित जुळवून कोणत्या विद्यापीठात व कोणत्या महाविद्यालयात फॉर्म भरावा याची अचूक माहिती ते देतात.
विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यास, इतर कोणत्या राज्यात त्याला संधी उपलब्ध आहे याची योग्य माहितीही ते पुरवितात. विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाऊ नये म्हणून कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही अंतिम क्षणापर्यंत प्रवेश मिळवून दिल्याचा त्यांना अभिमान आहे.
ते अभिमानाने सांगतात की आतापर्यंत 20 ते 25 हजार विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणात, तर 30 ते 35 हजार विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी परदेशातही शिक्षणासाठी गेले आहेत. या अथक मेहनतीचे फळ म्हणून सनबीम एज्युकेशन प्रवेश प्रक्रिया केंद्र आज चार शाखांमध्ये विस्तारले आहे.

नांदेड जिल्ह्यात दरवर्षी शिक्षणासाठी लाखांच्या घरात विद्यार्थी येतात. त्यांचे शिक्षण सोयीस्कर व्हावे व राहण्या-खाण्याची योग्य व्यवस्था व्हावी, या संवेदनशील विचारांतून त्यांनी ज्ञानश्री गर्ल्स अँड बॉईज हॉस्टेलची स्थापना केली. सध्या ते एकूण पाच हॉस्टेल्स चालवित आहेत. या कार्यातूनच 2020 साली नांदेड जिल्हा हॉस्टेल असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली.
याच काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व हॉस्टेल चालकांना एकत्र करून प्रशासनाच्या सहकार्याने पोलिसांची गस्त वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी करून घेतले. तसेच इंटरनेट ट्रेनिंग व सायबर क्राईमसारख्या विषयांवरील सेमिनारद्वारे जनजागृती केली.

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन 2011 साली माॅंसाहेब जिजाऊ संस्थेमध्ये प्री-प्रायमरी स्कूलची, तर 2024 साली ज्ञानेश्वरी स्कूल ऑफ नर्सिंगची स्थापना त्यांनी केली. त्यांच्या ध्येयप्रेरित कार्यामुळे ही संस्था आता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा व महाविद्यालयामध्ये रूपांतरित झाली आहे.

गजानन मोरे यांच्या पत्नी गौरी मोरे या देखील या सेवाभावी कार्यात सक्रिय आहेत. गरीब, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींसाठी त्यांनी अकोला, औरंगाबाद, पुणे, नांदेड व नागपूर येथे वस्तीगृहे सुरू केली आहेत. यामुळे अनेक मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आहेत.

गजानन मोरे यांच्या कार्याची दखल घेत 2018 साली त्यांना सकाळ माध्यम समूहाचा ‘महाराष्ट्रातील नामांकित युथ आयकॉन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2022 साली महात्मा फुले शिक्षक परिषदेचा शिक्षणरत्न पुरस्कार तसेच राष्ट्रीय युवा उद्योजक नागरिक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. 2024 साली पद्मनाभ फाउंडेशन, पुणे यांच्याकडून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ते विद्यार्थी व पालकांना नेहमी सांगतात की विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग योग्य समुपदेशनातूनच जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तम फीडबॅक असणाऱ्या काउंसलरचा सल्ला घ्यावा. विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यात मार्गदर्शक दुवा ठरलेले गजानन मोरे यांचे कार्य चिरंतर सुरू राहो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

गजानन मोरे – संपर्क क्रमांक : 9028999019

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *