■ महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २१ :दीर्घ कालावधीनंतर नागपूरच्या जामठा स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या टी २० सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. अर्ध्याअधिक उपराजधानी भारतीय क्रिकेट संघाचा पोशाख असलेल्या निळ्या रंगात न्हावून निघाल्याचे दिसून आले.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी २० मालिकेतील पहिला सामना बुधवारी नागपूरच्या जामठा स्टेडियममध्ये खेळला गेला. यासाठी दुपारपासूनच जामठाकडे जाणारे मार्ग चाहत्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. सर्वच मार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी मेट्रोचा मार्ग स्वीकारला.
दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीस आलेल्या भारतीय संघातील अभिषेक शर्मा याने ८ षटकार आणि ५ चौकार ठोकत केवळ ३५ चेंडूत ८४ धावांची स्फोटक खेळी केल्याने पैसा वसूल… अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून आली. रिंकू सिंहच्या धडाकेबाज फलंदाजीचाही स्टेडियम मधील दर्शकांनी मनसोक्त आनंद लुटल्याचे दिसून आले.




