भारताच्या प्रजेला आज प्रजासत्ताकाच्या शुभ दिनी आपल्या देशाचे नागरिक होण्याचा बहुमान मिळाला. स्वातंत्र्यपूर्व काळात राज-महाराजे होते, इंग्रज होते. पण आजच्या दिवशी १९५० साली आपण खऱ्या अर्थाने मूलभूत अधिकारांसह या देशाचे स्वतंत्र नागरिक झालो. त्यानंतरच्या वर्षांमध्ये भारताने अनेक प्रगतीची पावले उचलली.
पूर्वी एखाद्या जिल्ह्यामध्ये त्याकाळी अत्यंत कमी मोटारगाड्या असायच्या, आता त्याच्या लाख पटीपेक्षाही जास्त गाड्यांची संख्या आहे. संपूर्ण भारतातील चकाचक रस्ते, भारतीय जनतेचे सुधारलेले जीवनमान, भारताची वाढलेली आर्थिक शक्ती, भारताचे आदर्श सैन्यबळ, अन्नधान्याबाबत देशाची आत्मनिर्भरता, आरोग्यविषयक सुधारणा, जनसामान्यांना मिळणाऱ्या सुविधा किंवा सवलती, शेतीची वाढलेली उर्वराशक्ती, वाहनांचा वाढलेला वेग, रेल्वेगाडीतील महासुविधा, प्रचंड प्रमाणात वाढत असलेली विमान सेवेची दळणवळण विद्या, वगैरे वगैरे ही सर्व आपल्या भारताच्या प्रगतीची पावले आहेत.
आज जगात भारताला कोणीही डावलू शकत नाही, अशी आपली कीर्ती आहे. अशा या भारत मातेच्या वैभवाला आम्ही अभिवादन करतो. हा आपला सार्वभौम देश असाच गगनभेदी विकास करो. या शुभेच्छा देताना आमचे हृदय अत्याधिक अभिमानाने भरून आलेले आहे. भारताला आंतरराष्ट्रीय जगतात अधिक मानाचे स्थान मिळावे, हीच आमची अपेक्षा आहे.
जय हिंद!




