बदलापूर,दि.१८,प्रतिनिधी कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीचा गळा घोटून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बदलापूर पूर्व परिसरात घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्व शिरगाव परिसरात घटना घडली. पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे स्वरूप विकोपाला गेले.दि.१७ मार्च २०२६ रोजी सकाळच्या सुमारास आरोपी चंद्रकांत थोरात याने कमरेच्या पट्ट्याचा वापर करून पत्नीचा गळा आवळला. यात अश्विनी थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बदलापूर पूर्व पोलिस पुढील तपास करत आहेत.



