नवी मुंबई महानगर अस्तित्वात आले नव्हते, त्यावेळी या परिसरात विविध औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या. पण दिवसेंदिवस नवी मुंबई महानगराची आणि परिसराची वाढती लोकसंख्या विचारात घेता, लोकांच्या सुरक्षेच्या, आरोग्याच्या दृष्टीने या वसाहतींचे दूर कुठे तरी स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी एक नागरिक म्हणून बोलताना व्यक्त केले.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या”लोकशाहीचा जागर ” हा कार्यक्रम नुकताच वाशीत पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी ही अपेक्षा व्यक्त करून वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नवी मुंबई महानगर पालिकेने दुसरे धरण बांधले पाहिजे आणि शहराचा विकास, विशेषतः वाट्टेल तिथे उभे रहात असलेल्या टोलेजंग इमारती या मूळ विकास आराखडय़ाप्रमाणे आहेत का? इकडे ही लक्ष वेधले.
प्रशासकीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोशल ऑडिट आणि ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी करण्याची गरज असून नागरिकांनी स्वतः सजग राहून क्षेत्र समित्यांच्या माध्यमातून नागरी कामांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन महापालिकेचे निवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी
डॉ. संजय पत्तीवार यांनी करून सार्वजनिक आरोग्याची सुरुवात रुग्णालयातून नव्हे तर शहर नियोजनातून होते,असे स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको या दोन शासकीय यंत्रणांमधील वादांचा फटका सामान्य नागरिकांना आणि व्यावसायिकांना बसत असल्याचे बीएएनएमचे अध्यक्ष देवांग त्रिवेदी यावेळी म्हणाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे अनेक चांगले प्रकल्प अडकून पडत असल्याची उदाहरणेही त्यांनी दिली.
महिला सुरक्षेबाबत नवी मुंबईतील स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा उल्लेख स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रा. वृषाली मगदूम यांनी केला.
ज्या समस्या मुंबईत निर्माण झाल्याने नवी मुंबईची निर्मिती झाली, त्याच समस्या आज नवी मुंबईत निर्माण होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
शहरातील होल्डिंग पाँड्समधील गाळ न काढल्यास भविष्यात खाडीचे पाणी शहरात शिरण्याची भिती नवी मुंबई महापालिकाकेचे निवृत्त शहर अभियंता डॉ. मोहन डगांवकर यांनी व्यक्त केली.
इमारतींच्या पुनर्विकासापूर्वी रस्त्यांची रुंदी, सार्वजनिक वाहन तळ आणि सांडपाणी व्यवस्थेचा समावेश असलेला मास्टर फ्लॅन तयार होणे गरजेचे आहे, अन्यथा वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याच्या रस्ते आणि नागरी सुविधांवर प्रचंड ताण येईल, असा इशारा जेष्ठ पत्रकार श्री संजय सुर्वे यांनी दिला.
शहर केवळ सिमेंट आणि काँक्रीटचे न बनता वाचन संस्कृती, कला, नाट्य, साहित्य आणि स्थानिक उत्सवांमधून एक वेगळी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे, असे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष कुलकर्णी यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमास विविध कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.




