मुंबई : प्रतिनिधी:म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विविध म्हाडा वसाहतीतील रहिवाशांना आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्क तसेच भूखंडधारकांना आकारण्यात येणाऱ्या भूभाड्यापोटीची मोठी रक्कम थकीत आहे. रहिवासी सेवाशुल्क आणि भूखंडधारक भूभाडे भरत नसल्याने कोकण मंडळाचे नुकसान होत आहे. ही रक्कम आता ४५ कोटींच्या घरात गेली आहे.
यामुळे या थकबाकीच्या वसुलीसाठी मंडळाने विशेष मोहीम सुरू केली आहे. थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी विशेष पथके स्थापन केली असून आता ही पथके घरोघरी जाऊन थकबाकी वसूल करणार आहेत. यामुळे म्हाडा रहिवाशांना, भूखंडधारकांना थकीत रक्कमेचा भरणा करावा लागणार आहे.
म्हाडा वसाहतीतील रहिवाशांना संबंधित विभागीय मंडळांकडून पाणी, वीज यासह अन्य सुविधा पुरविल्या जातात.
यासाठी रहिवाशांना सेवा शुल्क आकारले जाते. हे सेवाशुल्क महिन्याला वसूल केले जाते. मात्र मोठ्या संख्येने रहिवासी सेवाशुल्क भरत नसल्याने मंडळांचे नुकसान होते. त्यामुळे थकबाकी वाढत जाते. म्हाडाच्या सर्व मंडळांप्रमाणे कोकण मंडळातही हेच चित्र आहे. कोकण मंडळाच्या कल्याण (चिकणघर), पेण, कर्जत, भिवंडी, टिटवाळा, नाचणे (रत्नागिरी), कुवारबांव (रत्नागिरी), अलिबाग, सावंतवाडी, वेंगुर्ला, बदलापूर, मुरबाड वडवली-मोरवली, रोहा, खोपोली, बाळकुम, मिरारोड, वर्तकनगरसह अन्य काही वसाहतीतील सेवाशुल्क आणि भूभाडे थकीत आहे. ही थकबाकी अंदाजे ३० कोटी रुपयांपर्यंतची आहे. तर यावरील व्याजाची रक्कम १५ कोटी रुपये अशी आहे. त्यामुळे एकूण रक्कम ४५ कोटी रुपये अशी आहे.




