बदलापूरमध्ये नगरपरिषद शाळेंकडून‘हिंद-दी-चादर’चा जागर; प्रभात फेरी, वक्तृत्व व निबंध स्पर्धांतून गुरु तेग बहादूर साहिबजींच्या त्यागाचा संदेश
बदलापूर, दि.१५,प्रतिनिधी,हिंद-दी-चादर’ उपक्रमात,श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या त्याग, बलिदान व धर्मनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमांना विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
यावेळी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देण्यात येत आहे. प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा जागर केला. तसेच अनेक शाळांमध्ये वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी समूहगीत गायनातून जनजागृती केली, तर गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित लघुपटही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.
या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश तरुण पिढीने गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा त्याग, बलिदान आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात ठेवावे, तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करावी, हा आहे.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘हिंद-दी-चादर’चा जागर कुळगाव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात प्रभावीपणे होत असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितले आहे.



