नवी मुंबई:तुर्भे येथील डॉ. सामंत विद्यालयात रस्ता सुरक्षे निमित्त विद्यार्थी आणि पालक यांचे प्रबोधन करून त्यांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले.सेवा सहयोगी ट्रस्ट आणि एपीएमसी वाहतूक पोलीस यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी नगरसेविका कविता पाटील, माथाडी कामगार नेते चंद्रकांत पाटील यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटे म्हणाले की, वाहन चालकांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टीने हा उपक्रम घेण्यात आला होता. रस्ते अपघात आणि त्यात घायाळ होणारे, मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होणे आवश्यक आहे. यासाठी वाहतूक पोलीस समजामध्ये सतत प्रबोधनात्मक उपक्रम राबवत आहेत. त्याच बरोबर विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट, विनागणवेश तसेच बँच न वापरणारे रिक्षा चालक तसेच इतर वाहन चालक यांच्यावर कारवाई देखील केली जात आहे. या वेळी विद्यार्थी आणि पालक यांना वाहतूक नियमांचे पालन करणे कसे आवश्यक आहे याचे महत्त्व पटवून देणारी उदाहरणे दिली. तसेच आपले पालक विनाहेल्मेट किंवा सीटबेल्ट यांचा वापर करून सुरक्षित वाहन चालवतात ना याकडे लक्ष द्यावे असे आवाहन घंटे यांनी विद्यार्थ्यांना केले. या वेळी विद्यार्थी आणि पालक यांना ३०० हेल्मेट वाटप करण्यात आले.




