बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा ध्यास आणि आयुर्वेदाचा प्रकाश: डॉ. तन्मय जाजू यांचा प्रेरणादायी प्रवास
धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा या छोट्याशा गावातील मातीचा गंध अंगाखांद्यावर खेळवत, संस्कारांची शिदोरी सोबत घेऊन निघालेला एक तरुण आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘सुख आरोग्य’ या मंत्राने ओळखला जातो, ते म्हणजे डॉ. तन्मय श्यामसुंदर जाजू. केवळ एक आयुर्वेदाचार्य ही त्यांची ओळख नसून, ते एक उत्तम शेतकरी, कुशल समुपदेशक, मार्गदर्शक शिक्षक आणि सातत्याने ज्ञानसाधना करणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत.
बंगळूरमधील राजीव गांधी युनिव्हर्सिटीमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, केवळ रुग्णसेवा आणि दवाखाना या पारंपरिक चौकटीत स्वतःला अडकवून न ठेवता, समाजाची हरवलेली जीवनपद्धती पुन्हा मिळवून देण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांना वडिलांचे आध्यात्मिक संस्कार आणि सासरच्या मंडळींचे खंबीर पाठबळ लाभले. डॉ. तन्मय यांच्या कार्याचा आवाका केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर त्यांनी मुंबईत तब्बल आठ वर्षे एमपीएससी आणि यूपीएससीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना घडवले आहे. ‘आपण विकसित होऊन मोठ्या पदावर जावे आणि सर्वसामान्यांची सेवा करावी’ ही जिद्द त्यांनी या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली. आज त्यांचे ‘हरवलेली जीवनपद्धती’ आणि ‘शरीराचे अनावरण’ ही दोन पुस्तके घराघरांत पोहोचली असून, आगामी सहा पुस्तकांच्या माध्यमातून ते एका नव्या आरोग्य क्रांतीची मशाल पेटवत आहेत.
या सर्व प्रवासाविषयी डॉ. तन्मय जाजू आपली सविस्तर प्रतिक्रिया देताना म्हणतात की, “माझ्या आयुष्याची जडणघडण ही केवळ पदव्या मिळवण्यासाठी झालेली नाही, तर ती निसर्गाशी आणि समाजाशी एकरूप होण्यासाठी झाली आहे. आयुर्वेदाकडे मी केवळ एक उपचार पद्धती म्हणून न पाहता, ती जगण्याची एक कला म्हणून पाहतो. आजच्या धावपळीच्या युगात माणसाने स्वतःचे आरोग्य आणि मानसिक संतुलन गमावले आहे. ‘सुख आरोग्य’ या उपक्रमाच्या माध्यमातून मला नेमकी हीच हरवलेली जीवनपद्धती पुन्हा लोकांच्या दारात नेऊन ठेवायची आहे. माझ्या संशोधनातून मला असे जाणवले की, अनेक आजारांचे मूळ हे आपल्या विस्कळीत दिनचर्येत आहे. त्यामुळेच मी औषधांसोबतच समुपदेशन आणि लेखनावर भर दिला. मुंबईत विद्यार्थ्यांना शिकवताना मला जाणीव झाली की, ग्रामीण भागातील मुलांमध्ये अफाट बुद्धिमत्ता आहे, त्यांना फक्त योग्य दिशा आणि आत्मविश्वासाची गरज असते. तेच काम मी मनापासून केले. आज जेव्हा माझे रुग्ण किंवा माझे विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचतात, तेव्हा मला मिळणारे समाधान हे कोणत्याही मानधनापेक्षा मोठे असते. निसर्गाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतूनच माझी पुढची वाटचाल सुरू राहील आणि येणाऱ्या पुस्तकांच्या माध्यमातून मी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन.”
तन्मय यांच्या या यशाचे मूळ त्यांच्या वडिलांच्या, श्यामसुंदर जाजू यांच्या संस्कारांत आहे. तेरखेडा येथील अग्नि मंदिरातील मुख्य पुजारी आणि अग्निहोत्राचे गाढे अभ्यासक असलेले श्यामसुंदरजी आपल्या मुलाच्या कार्याबद्दल अभिमानाने सांगतात की, “तन्मय हा लहानपणापासूनच ‘स्व’पेक्षा ‘पर’चा विचार करणारा मुलगा आहे. तो केवळ जाजू परिवाराचा दिवा नाही, तर तो अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पसरवणारा एक स्रोत बनला आहे. मी त्याला नेहमी एकच शिकवण दिली की, रोजचे अग्निहोत्र आपल्याला चराचराशी जोडते आणि हीच विश्वात्मकतेची भावना त्याच्या कामात दिसते. मी त्याला कधीच म्हटले नाही की तू फक्त दवाखाना टाकून पैसे कमव किंवा स्वतःचे आयुष्य सुधरव, कारण मला ठाऊक होते की त्याची दृष्टी व्यापक आहे. स्वतःचे आयुष्य सुधरवणारे अनेक असतात, पण लोकांचे आयुष्य अधिक चांगले कसे होईल, यासाठी जो अहोरात्र धडपडतो तोच खरा समाजसेवक. तन्मयच्या कामात मला ती तळमळ दिसते. त्याने आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन जे काम उभे केले आहे, ते पाहून एक वडील म्हणून माझे हृदय भरून येते. त्याची बहीण गार्गी आणि जावई श्रीकांत हे देखील परदेशात राहून सेवा कार्य करत आहेत, हे आमच्या संस्कारांचेच फळ आहे.”
केवळ जन्मदातेच नव्हे, तर सासरच्या मंडळींकडूनही तन्मय यांना तितकाच सन्मान आणि प्रेम मिळाले आहे. त्यांचे सासरे कचरू सारडा तन्मय यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणतात की, “तन्मय हा केवळ जाजू परिवाराचा राहिला नसून, त्याने आमच्या सारडा परिवारासह अनेक कुटुंबांना आपलेसे केले आहे. त्याची कुशलता, अफाट बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व हे थक्क करणारे आहे. शेती असो, उद्योग असो, समुपदेशन असो किंवा वैद्यकीय क्षेत्र, या सर्व आघाड्यांवर त्याने जे यश मिळवले आहे, त्यामागे त्याची शुद्ध नियत आहे. माझा असा विश्वास आहे की ज्याची नियत साफ असते आणि ज्याला खऱ्या अर्थाने लोकसेवा करायची असते, त्याला निसर्ग स्वतःहून मदत करतो. तन्मयच्या बाबतीत नेमके हेच घडताना दिसत आहे. एक डॉक्टर जेव्हा लेखक बनून लोकांची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो समाजाचा खऱ्या अर्थाने वैद्य ठरतो. तन्मयने आजवर जे कमावले आहे ते केवळ धन नाही, तर लोकांचा विश्वास आणि आशीर्वाद आहेत. त्याच्या या कार्यात आमचा सारडा परिवार नेहमीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, कारण तो आमच्यासाठी केवळ जावई नसून एक आदर्श मार्गदर्शक आहे.” असा हा डॉ. तन्मय जाजू यांचा प्रवास कौतुकास पात्र असून महाराष्ट्राच्या आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी एक वेगळी लकीर ओढली आहे.
डॉ. तन्मय जाजू यांच्या या प्रवासाकडे पाहताना केवळ एक यशस्वी डॉक्टर दिसत नाही, तर समाजाच्या वेदनांवर फुंकर घालणारा एक संवेदनशील माणूस दिसतो. वडिलांच्या संस्कारांतील माणुसकी आणि सासरच्यांचे प्रेमळ पाठबळ यांमुळेच आज ते हजारो लोकांसाठी ‘आरोग्यदूत’ ठरले आहेत. ज्या मातीने त्यांना घडवले, त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी ते अहोरात्र धडपडत आहेत. संकटात सापडलेल्या रुग्णाला औषधासोबतच त्यांच्या शब्दांतून जगण्याची नवी उमेद मिळते. शेती, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा अशा विविध आघाड्यांवर लढताना त्यांनी स्वतःला समाजासाठी वाहून घेतले आहे. त्यांचा हा सेवायज्ञ असाच तेवत राहो आणि ‘सुख आरोग्य’चा प्रकाश घराघरांत पोहोचो, हीच सदिच्छा. खरंच, माणुसकी जपणारा हा ‘वैद्य’ समाजासाठी एक अनमोल देणगी आहे. ज्यांची नाळ आपल्या मुळाशी घट्ट असते, तीच माणसे आभाळाला गवसणी घालू शकतात, हेच तन्मय यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या या निस्वार्थ कार्याला संपूर्ण महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!




