खांदा कॉलनी :पनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ (अ, ब, क) मध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश संपादन करत विजयी हॅट्रिक साधली आहे. या घवघवीत यशामागे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. दशरथ म्हात्रे यांचे नेतृत्व निर्णायक ठरले आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या दशरथ म्हात्रे यांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. व्यवसाय सांभाळत असतानाच त्यांनी राजकारणातही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
खांदा कॉलनी परिसरात भाजपाचे युवा नेते म्हणून त्यांनी अनेक वर्षे सक्रिय कार्य केले. त्यानंतर मंडळ अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली.
या विश्वासाला पात्र ठरत श्री. दशरथ म्हात्रे यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. खांदा कॉलनीतील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘आनंदी ग्रुप’ या संघटनेचा त्यांना मोठा पाठिंबा लाभला. आनंदी ग्रुपमार्फत केपीएल क्रिकेट क्लब (४०+), मॅरेथॉन, बॅडमिंटन स्पर्धा, वैद्यकीय शिबिरे असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या सर्व उपक्रमांमध्ये दशरथ म्हात्रे यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
आनंदी ग्रुपचे अध्यक्ष श्री. संजय पाटील तसेच दिवंगत नगरसेवक संजय भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संजय भोपी सोशल क्लब’ची स्थापना करण्यात आली. क्लबच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये आनंदी ग्रुपचे मोठे वर्चस्व पाहायला मिळाले. संघटनेतील ३०० ते ४०० कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे भाजपाच्या चारही जागा खांदा कॉलनीतून विजयी झाल्या.
नवनिर्वाचित नगरसेवक एकनाथ गायकवाड, सौ. सीता पाटील आणि सौ. कुसुम पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या यशाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
यावेळी आनंदी ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील, घुगे साहेब, दिलीप कोरडे, सुरेश म्हात्रे, मोतीराम कोळी, भीमराव पवार, प्रदीप इंगळे, रत्नाकर वाघ तसेच आनंदी ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




