अंबरनाथ , दि . १९ प्रतिनिधी : अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंग गडावर गेल्या १५ वर्षांपूर्वी फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प सुरु करण्यात आला होता. अनेक अडथळे, प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक आव्हाने पार करत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेला असुन या फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचे काल आमदार किसन कथोरे व आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते उद्गाटन करण्यात आले आहे.
श्री मलंग गडावर वृध्द अपंग दिव्यांग यांना व्यवस्थीत जाता यावे म्हणुन २००४ मध्ये हा फ्युनिक्युलर पायलट प्रोजेक्ट ची सुरवात झाली होती. सुमारे १२०० मीटर लांबीचा हा देशातील सर्वात मोठा फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प असून, बीओटी (Build–Operate–Transfer) तत्त्वावर राबविण्यात आलेला हा प्रकल्प राज्य शासनाच्या पथदर्शी प्रकल्पांपैकी एक आहे.
मलंगगड परिसर हा इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासह विविध शासकीय विभागांकडून परवानग्या मिळवणे अतिशय क्लिष्ट व वेळखाऊ प्रक्रिया होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळे आवश्यक मंजुरी मिळू शकली. मंजुरीनंतर प्रत्यक्ष काम ही अत्यंत आव्हानात्मक ठरले. मलंगगडाची खडतर भौगोलिक रचना लक्षात घेता रेल्वे मार्ग उभारणे हे मोठे तांत्रिक आव्हान होते. तरीही सर्व संबंधित यंत्रणा, अभियंते व कामगारांनी अथक परिश्रम घेऊन हा प्रकल्प यशस्वी करून दाखवला आहे . मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार तसेच मा. श्री. एकनाथजी शिंदे यांनी अशा या नाविन्यपूर्ण व लोकहिताच्या प्रकल्पांसाठी नेहमीच प्रोत्साहन दिले, त्यामुळेच हा प्रकल्प पुर्ण झाल्याचे समजते .
या फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पामुळे मलंगगडावरील रहिवासी, भाविक तसेच पर्यटक यांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. अवघ्या ४ ते ५ मिनिटांत गडावर पोहोचणे शक्य होणार असून, यामुळे मुंबई व ठाणे परिसरातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे आकर्षित होतील. परिणामी या संपूर्ण भागाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास स्थानिकानी व्यक्त केला आहे. तर हा फ्युनिक्युलर प्रोजेट ज्या कंपनीने उभारला त्या सुप्रिम कंपनीने भक्तांसाठी दोन दिवस मोफत प्रवास ठेवला आहे.




