विमुक्त जाती व भटक्या जमातीतील तरुणांसाठी ‘वनार्टी’चा सर्वंकष आराखडा; मंत्री अतुल सावे यांची माहिती
विशेष प्रतिनिधी, मुंबई:विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना शिक्षण आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (वनार्टी) सर्वंकष रोडमॅप तयार करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित ‘वनार्टी’च्या संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत ‘महाज्योती’च्या धर्तीवर वनार्टीमार्फत सुमारे २,००० विद्यार्थ्यांना UPSC, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच, शेती आणि उद्योग क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी ३५० विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करून रोजगाराच्या संधी मिळवणे सोपे होणार आहे.
संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षण धोरण, लेखांकन धोरण आणि कर्मचारी भरती आराखड्याला (Staffing Pattern) या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांशी करार करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
या बैठकीला विभागाचे सहसचिव सुनील तुंबारे, वनार्टीचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे आणि संचालक मंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.




