अजितदादांच्या निधनाचा ‘इव्हेंट’ करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आता खैर नाही! सुनेत्रा पवारांचा मंत्रालयातील त्या ७५ ‘फाईल’ प्रकरणावर सर्जिकल स्ट्राईक?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्र ज्या दिवशी आपल्या लाडक्या नेत्याच्या विरहाने अश्रू ढाळत होता, ज्या दिवशी घराघरात चूल पेटली नव्हती, त्याच काळ्या दिवशी मंत्रालयातील काही ‘पांढरपेशी नरभक्षकांनी’ ७५ संस्थांना अल्पसंख्याक दर्जाची खिरापत वाटण्याचा लाजीरवाणा प्रकार केला आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राज्यात दुखवटा असताना, मंत्रालयातील एसी केबिनमध्ये बसून फाईल्सचा जो खेळ रंगला, त्यावरून आता संतापाचा ज्वालामुखी फाटला आहे. या निर्लज्ज प्रकाराची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून दोषी अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना काही निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी ७५ शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देऊन आपल्या इमानाची किंमत काय, हेच दाखवून दिले. या संस्थांना दर्जा देण्यासाठी इतकी कसली घाई लागली होती की त्यांना राज्याचा दुखवटाही नडल्या गेला नाही? हा केवळ प्रशासकीय गोंधळ नसून, संधी मिळताच राज्याच्या तिजोरीवर आणि नियमांवर डल्ला मारण्याचा हा एक संघटित कट असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या निर्णयाला स्थगिती दिली असली, तरी सुनेत्रा पवार यांनी आता या प्रकरणाचा पंचनामा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवारांचा रुद्र अवतार मंत्रालयाने पाहिला. “आमचा नेता गेला, महाराष्ट्र रडतोय आणि तुम्ही मात्र फाईल्स उजळत बसलात? हा महाराष्ट्रद्रोह नाही का?” अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचे समजते. ज्या शाळांना चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्रे वाटण्यात आली, त्या प्रकरणाची मुळापासून चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ‘अल्पसंख्याक विभागाचा निधी म्हणजे काही कुणाची खाजगी मालमत्ता नाही’ अशा शब्दांत त्यांनी भ्रष्ट यंत्रणेला सुनावले आहे.
सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या या आक्रमक निर्णयामुळे मंत्रालयातील त्या ‘फिक्सर’ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. केवळ स्थगितीवर समाधान न मानता, या प्रकरणातील सूत्रधार कोण आणि यामागे कोणाचे ‘आर्थिक हित’ दडले होते, हे शोधून काढण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. ज्या हातांनी शोककाळात या फाईल्सवर सह्या केल्या, त्या हातांना आता बेड्या ठोकल्या जाणार का? हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल. सुनेत्रा पवारांच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे ‘दादां’च्या निधनानंतरही प्रशासनावर पवारांचा वचक कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे.




