आलेख डॉ. प्रवीण डबली

लोकनेते बापूसाहेब साठे : संसद, समाज आणि संस्कृती जोडणारे व्यक्तिमत्त्व;१०१ व्या जयंतीनिमित्त स्मरण

डॉ. प्रवीण डबली:भारतीय राजकारणात विदर्भातून राष्ट्रीय पातळीवर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांमध्ये वसंत साठे (बापूसाहेब साठे) यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. ५ मार्च १९२५ रोजी जन्मलेल्या या दूरदृष्टीच्या नेत्याने कामगार चळवळ, संसद, केंद्र सरकार आणि सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध स्तरांवर उल्लेखनीय काम केले. आज त्यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा पुन्हा एकदा स्मरण करणे म्हणजे विदर्भाच्या राजकीय इतिहासातील एका महत्त्वाच्या अध्यायाला उजाळा देणे होय.

समाजवादी चळवळीतून राष्ट्रीय राजकारणात

नागपूरच्या कामगार चळवळीतून बापूसाहेब साठे सार्वजनिक जीवनात आले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने आणि समाजवादी विचारांनी प्रभावित होऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर १९७१ मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांची दमदार एंट्री झाली.

दूरदर्शनच्या नव्या युगाचे शिल्पकार

१९८० मध्ये ते माहिती व प्रसारण मंत्री झाले. त्यांच्या कार्यकाळात भारतात दूरदर्शनचे राष्ट्रीय प्रसारण विस्तारले आणि १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर रंगीत दूरदर्शनचा प्रारंभ झाला. त्यामुळे भारतातील प्रसारमाध्यमांच्या इतिहासात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. पुढे त्यांनी रसायन, खत व औषध अशा मंत्रालयांची जबाबदारीही सांभाळली.

संसदेत अभ्यासू व विचारशील नेता

बापूसाहेब साठे जवळपास दोन दशके संसदेत सक्रिय राहिले. राष्ट्रीय राजकारणातील संवैधानिक प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्या. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाला त्यांनी ठाम पाठिंबा दिला आणि १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेच्या काळात त्यांनी पुढाकार घेऊन पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भूमिका मांडली.

विदर्भासाठी सातत्याने आवाज

विदर्भाच्या विकासाचा प्रश्न त्यांनी सातत्याने राष्ट्रीय पातळीवर मांडला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या संकल्पनेला त्यांनी उघडपणे समर्थन दिले. संसद, नागपूर अधिवेशन आणि विविध सार्वजनिक मंचांवरून त्यांनी हा मुद्दा मांडत विदर्भाचा प्रश्न राष्ट्रीय चर्चेत आणला.

राजकारणाबरोबर सांस्कृतिक जिव्हाळा

राजकारणाच्या पलीकडे साहित्य, नाटक, चित्रपट आणि संगीत यांविषयी त्यांना विशेष प्रेम होते. दिल्लीतील महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमांतून त्यांनी मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना दिली. विविध विचारधारांच्या नेत्यांशी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. बाळासाहेब देवरस आणि सुमित्रा महाजन यांसारख्या नेत्यांशी त्यांचे आत्मीय संबंध होते.

विचारवंत आणि लेखक

सक्रिय राजकारणानंतर त्यांनी लेखन, संशोधन आणि आर्थिक सुधारणा यांवर काम केले. “Tax without Tears” ही करव्यवस्थेवरील त्यांची संकल्पना चर्चेत राहिली. अर्थव्यवस्था, संघराज्य व्यवस्था आणि लहान राज्यांच्या संकल्पनेवर त्यांनी लेखन केले.

प्रेरणादायी वारसा

२३ सप्टेंबर २०११ रोजी त्यांचे निधन झाले, पण त्यांच्या कार्याचा ठसा आजही कायम आहे. लोकाभिमुख राजकारण, विदर्भावरील प्रेम आणि सांस्कृतिक जाण यांचा संगम असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व आजही प्रेरणा देणारे आहे.

१०१ व्या जयंतीनिमित्त लोकनेते बापूसाहेब साठे यांना विनम्र अभिवादन.

डॉ प्रवीण डबली
ज्येष्ठ पत्रकार
9422125656/7020343428

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *