अंबरनाथ

शिवतंत्राने क्रांती घडू शकते. – किरण सोनवणे

अंबरनाथ , दि . २० प्रतिनिधी : इतिहास उगळण्याची नाही तर इतिहास घडविण्याची वेळ आली आहे. येणारा काळ हा बुद्धिमत्तेचा काळ आहे. क्रांती डोक्याने घडते. शिवतंत्राणे क्रांती घडू शकते असे उद्गार शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, किरण सोनवणे यांनी अंबरनाथ येथे डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना काढले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल हंडोरे होते.

डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान या सेवाभावी नोंदणीकृत संस्थेच्या वतीने अंबरनाथ पूर्वेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात किरण सोनवणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांना जाती पुरते मर्यादित करण्यात आले आहे. शिवरायांनी अठरा पगड जाती जमाती, धर्म, पंथ यातील मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली. शिवरायांनी अंधश्रद्धा पाळली नाही , तर त्यानी शूरवीर योद्धा शोधले. आता जगात ज्ञानाचे युग आहे. ज्या देशाकडे सर्वोच्च प्रतीचे ज्ञान असेल तो देश जगावर राज्य करेल. नव्या युगाशी सूर जुळविण्यासाठी ज्ञान, मित्रता आणि देश सर्व क्षेत्रात पुढे कसा येईल यावर चिंतन करून त्यावर अंमल करण्याची गरज आहे असे ही किरण सोनवणे म्हणाले. विकासक प्रतिक घावट म्हणाले की, शिवाजी राजे झाले नसते तर भारत देश पोरका झाला असता. शिवाजी महाराजांची नियोजनबद्ध पद्धती, विचारसरणी अंमलात आणली पाहिजे.

मंत्रालयातील अवर सचिव अजित तायडे यांनी शिवरायांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाशझोत टाकला. माजी उपसचिव कैलास भंडालकर म्हणाले की, शिवरायांनी भटके विमुक्ताना सहकार्य केले. भटक्या समाजाचे बहिरजी नाईक यांना हेरखात्याचे प्रमुख बनविले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कुसुम गौतम म्हणाल्या की, शिवरायांनी महिलांचा सन्मान केला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना सामानतेचा अधिकार दिला. कार्यक्रमाला सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, झोनल संघटक सुधाकर बर्वे, कवी साहित्यिक सुधाकर सरवदे, धम्म प्रचारक के बी ब्राह्मणे, बौद्धाचार्य अक्षयमती, बौद्धमहासभा प्रतिनिधी भिमराव राजगुरू, शिक्षण क्षेत्रात काम करणारे डी एस मोरे मराठवाडा नामांतर चळवळीवर पुस्तक लिहिणारे लेखक भास्कर बोराळे आदि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक जाधव, गुणवंत वाकळे, आढाव यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *